विजय कमळे पाटील, प्रतिनिधी
जालना, 27 नोव्हेंबर : शिवसेना नेते आणि माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) यांच्यामागे लागलेला ईडीचा (ED) ससेमिरा आज दुसऱ्या दिवशीही कायम असल्याचं बघायला मिळतंय. ईडीच्या पथकाकडून आज दुसऱ्या दिवशी देखील अर्जुन खोतकर सभापती असलेल्या जालना कृषी उत्पन्न बाजार समितीत (Jalna APMC) झाडाझडची घेणं सुरु आहे. या छापेमारीत ईडी पथकाकडून (ED Raid) आज कृषी उत्पन्न बाजार समितीचे सर्व दस्ताऐवज तपासले जात आहेत. या कारवाई दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये किंवा कारवाईत कोणतीही अडचण येऊ नये यासाठी सीआरपीएफचे (CRPF) सशस्त्र जवान बाजार समितीच्या कार्यालयाबाहेर तैनात करण्यात आले आहेत.
विशेष म्हणजे ईडीने काल बाजार समितीच्या कार्यालयापासूनच चौकशीला सुरुवात केली होती. त्यानंतर ईडीचे पथक खोतकर यांच्या भावाच्या कार्यालयात गेलं होतं. त्यानंतर दुपारी दोन वाजता खोतकरांच्या 'दर्शन' या निवासस्थानी ईडीचं पथक गेलं होतं. ईडीच्या पथकाकडून रात्री दोन वाजेपर्यंत खोतकरांची चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर रात्री दोन वाजता हे पथक औरंगाबादच्या दिशेला निघालं होतं. पण हे पथक आज सकाळी पुन्हा जालन्यात दाखल झालं आहे. दरम्यान, दोन दिवसांपासून सुरु असलेल्या छापेमारीत ईडीच्या हाती नेमकं काय लागलंय ते अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही.
हेही वाचा : 'भावना गवळी स्वत: केलेल्या 100 कोटी घोटाळ्याची शिक्षा आईला देऊ नका', किरीट सोमय्यांचा घणाघात
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी जालन्यातील रामनगर साखर कारखाना खरेदी प्रकरणी शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांच्यावर 100 कोटी घोटाळ्याचा गंभीर आरोप केला आहे. सोमय्यांनी आरोप केल्यानंतर शुक्रवारी (26 नोव्हेंबर) ईडीचं एक पथक खोतकर यांच्या घरावर दाखल झालं. त्यांनी रामनगर साखर कारखाना खरेदी प्रकरणी खोतकरांची कसून चौकशी केली. विशेष म्हणजे ईडीच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी खोतकरांची सलग 12 तास चौकशी केली. पण 12 तासांच्या चौकशीनंतरही ईडीच्या अधिकाऱ्यांचं समाधान झालेलं नाही. त्यामुळे त्यांनी आज पुन्हा जालना कृषी उत्पन्न बाजार समितीत छापा टाकत कागदपत्रांची पडताळणी सुरु केलीय.
किरीट सोमय्या यांनी अर्जुन खोतकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. खोतकरांनी रामनगर साखर कारखाना हा बेनामी खरेदी केल्याचा आरोप सोमय्यांनी केला आहे. तसेच "अर्जुन खोतकर यांनी साखर कारखान्यात घोटाळा तर केलाच पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कृपेने याच कारखान्याशी संबंधित 100 एकर शासकीय जागा गिळंकृत करण्याचा प्रयत्न सुरु आहे. खोतकरांना ही 100 एकर जागा बिल्डिंग, मॉल्स, कर्मिशिअल कॉम्पलेक्स करण्यासाठी हवी आहे. ही जमीन साखर कारखान्यासाठी देण्यात आली होती. त्या जागेची किंमत 400 कोटी आहे. शासकीय जमीन मिळून संपूर्ण जागा ही जवळपास 240 एकर आहे. त्याची एकूण किंमत 1 हजार कोटी इतकी आहे", असा आरोप सोमय्या यांनी केला आहे.
हेही वाचा : 'महाराष्ट्रात मार्च-एप्रिल महिन्यात युतीचं पुन्हा सरकार येणार', रामदास आठवलेंनी फॉर्म्युलाच सांगितला
"आता ईडीने व्यवस्थित तपास सुरु केला आहे. मी आयकर विभागाला देखील याची तक्रार दिली आहे. जे बेनामी व्यवहार झाले आहेत त्याप्रकरणी मुळे परिवार, तापडीया परिवार आणि मुंबईचे सह आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या पत्नी रुपाली नांगरे पाटील यांचं देखील नाव पुढे येत आहे", असा दावा सोमय्या यांनी केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.