मुंबई, 12 डिसेंबर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचा आज 81 वा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने देशभरातून त्यांना शेकडो दिग्गजांनी शुभेच्छा दिल्या आहेत. विशेष म्हणजे पवारांच्या वाढदिवसानिमित्ताने मुंबईत नेहरु सेंटरमध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेसकडून (NCP) विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी शरद पवार यांनी देशाचं नेतृत्व करावं. त्यांनी पंतप्रधानपदी विराजमान व्हावं, अशी भावना व्यक्त केली होती. त्यानंतर अनेकांनी या विधानाचं समर्थन केलं. पण विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी याच विधानावर मिश्किल टीका केली आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज मुंबईतील कांदिवली पूर्व इथे राष्ट्रमाता जिजाऊ महिला आधार भवनचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी पत्रकारांनी शरद पवार यांच्या पंतप्रधान व्हावं या राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या मताविषयी प्रश्न विचारला असता त्यांनी मिश्किल उत्तर दिलं. "शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा! त्यांचा पक्ष स्थापन झाल्यापासून त्यांना पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून पाहिले जाते. पण त्यांचे आजवर दहाच्यावर खासदार निवडून आलेले नाहीत. तरी देखील स्वप्न बघू शकतात. स्वप्न बघायला काही हरकत नाही", असा चिमटा देवेंद्र फडणवीसांनी काढला.
हेही वाचा : 'काही लफडं केलं असेल तर पडली असेल धाड, आमच्या काय बापाचं जातं?'
"देशभरात आज जातीपातीचे राजकारण सुरू आहे. धार्मिक उन्माद उफाळून आला आहे. प्रत्येक समाजामध्ये टोकाच्या भूमिका निर्माण झाल्या आहे. त्यामुळे देशाला पवार साहेबांच्या नेतृत्त्वाची गरज आहे. जर 26 खासदार असलेल्या गुजरातमधील व्यक्ती पंतप्रधानपदी विराजमान होऊ शकते तर महाराष्ट्रात 48 खासदार असलेल्या पक्षाची व्यक्ती शिवरायांचा मावळा या सर्वोच्चपदी विराजमान होऊ शकते", असं अमोल कोल्हे म्हणाले होते.
दरम्यान, कांदिवली येथील कार्यक्रमात भाषण करताना देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर सडकून टीका केली. "कोरोनाच्या काळात अनेक शाखांना टाळे लागले होते. त्याचवेळी भाजप आमदार अतुल भातखळकर हे आपल्या भागातील नागरिकांना अन्न-धान्य पुरवत होते. सगळ्या माताभगिनींना पायावर उभे करण्याचे काम अतुलजींनी केले. एकीकडे मतदारांच्या समस्या सोडवत होते पण त्याचबरोबर सरकारला धारेवर सुद्धा धरत होते. त्यांनी सरकारची लक्तरे वेशीवर टांगली", असा निशाणा फडणवीसांनी केला.
"गरीब लोकांच्या नावावर कोट्यवधी रुपयांचे भ्रष्टाचार झाले. सत्ताधाराऱ्यांच्या नातेवाईकांच्या कंपन्या स्थापन झाल्या आणि नको त्या वस्तू खरेदी केल्या गेल्या. दहीसर बोईसर नदी स्वच्छ होईल. मुंबई महापालिकेची भष्ट्राचाराची गटारगंगा कशी स्वच्छ करणार?", असा खोचक सवाल त्यांनी केला.
हेही वाचा : निवडणूक हरला म्हणून उमेदवाराने मतदारांनाच दिली शिक्षा; Video समोर आल्यानंतर अटक
"आम्हाला विरोधी पक्षनेता पद मिळू नये म्हणून काय काय कुल्पत्या केल्या. पण विरोधी पक्षनेतापद दिले नाही म्हणून आम्ही विरोध करणे थांबवू असे नाही. मुंबईत आज झोपडपट्टीवासीयांना द्यायला घरं मिळतील, असे मला वाटत नाही. कारण सरकार काहीच करत नाही. कामे थांबली आहेत. हे सरकार हालत-डूलत नाही. चालत नाही आणि बोलतही नाही. एसआरए भ्रष्टाचाराने बरबटलेले आहे", असा आरोप फडणवीसांनी केला.
"आता मेट्रो कंट्राटदारांना तीन तीन ठिकाणी हजेरी लावावी लागते. त्यामुळे कुणाकुणाला काय देणार म्हणून काम थांबले आहे. सामान्यांच्या महाराष्ट्र धर्म जागृत करणे गरजेचे आहे. यावेळी महापालिका निवडणुका आला की भावनिक डायलॅागबाजी होईल. यावेळी महापालिकेत परिवर्तन करायचे आहे. महापालिकेला भ्रष्टाचारातून मुक्त करायचे आहे. आपला सगळ्यांचा एकच संकल्प असला पाहीजे की 2024 ला महाराष्ट्रात भाजपची स्वबळावर सत्ता आणायची आहे", असं फडणवीस यावेळी म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.