पालघर, 15 जून : दोन दिवसांपूर्वी शिवसेनेकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या लोकप्रियतेबाबत करण्यात आलेल्या सर्व्हेची एक जाहिरात वृत्तपत्रांमध्ये छापण्यात आली होती. या जाहिरातीवरून वातावरण चांगलंच तापलं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी शिवसेनेकडून वृत्तपत्रांमध्ये सुधारित जाहिरात छापण्यात आली. या जाहिरातीमुळे भाजपात नाराजीचं वातावरण असल्याचं बोललं जात होतं. मात्र आता त्यावर खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच प्रतिक्रिया दिली आहे. ते पालघरमध्ये शासन आपल्या दारी कार्यक्रमात बोलत होते. नेमकं काय म्हणाले फडणवीस? आमचा प्रवास 25 वर्षांचा आहे, काल, आज आणि उद्याही आम्ही एकत्रच रहाणार आहोत. आम्ही खुर्चीसाठी नाही तर लोकांच्या कल्याणासाठी एकत्र आलो आहोत. त्यामुळे एखाद्या जाहिरातीनं आम्हाला फरक पडत नाही. हे सरकार अनेक क्रांतिकारी निर्णय घेत आहे, अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी या जाहिरातीवर दिली आहे. उद्धव ठाकरेंना टोला पुढे बोलताना ते म्हणाले की आज आनंदाचा दिवस आहे. लाखो लोकांपर्यंत शासन पोहोचत आहे. शासनाचा लाभ आता लोकांना मिळत आहे. मागचे सरकार होते ते आपल्या घरी पण हे सरकार तुमच्या दारी आहे, असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरे यांना देखील जोरदार टोला लगावला आहे. जनसामान्यांसाठी योजना अनेक असतात पण त्या लोकांपर्यंत पोहचल्या पाहिजेत. पंतप्रधानांनी लाभ वितरण व्यवस्था थेट केली आहे, आणि शिंदे साहेबांच्या नेतृत्वात हे लाभ लोकांपर्यंत पोहोतच असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.