नवी दिल्ली, 15 नोव्हेंबर : महाराष्ट्राच्या राजकारणाशी संबंधित सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेना पक्षाचे नाव, चिन्ह गोठवण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान देणारी उद्धव ठाकरेंची याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर पक्षचिन्हावर दोन्ही गटांनी दावा केला होता. आता याबाबत निवडणूक आयोगाने निर्णय घेत धनुष्यबाणाचं चिन्हच गोठवलं. याविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने न्यायालयात धाव घेत हा निर्णयच रद्द करण्याविषयी याचिका केली होती. पण उद्धव ठाकरेंच्या पक्षाला धक्का देणारा निर्णय कोर्टाने दिला आहे. शिवसेना पक्ष प्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मागची संकटे काही केल्या दूर होताना दिसत नाहीत. मागच्या 3 महिन्यापूर्वी पक्षातील आमदार फुटले त्यानंतर काही महिन्यांनी पक्षाचे चिन्ह गेले. मागच्या 3 महिन्यांपूर्वी एकनाथ शिंदे यांच्यासह 40 आमदारांना शिवसेनेसोबत बंडखोरी करत भाजपसोबत हातमिळवणी केली. यानंतर एकनाथ शिंदे यांनी थेट पक्षाच्या चिन्हावर दावा केल्याने शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह निवडणूक आयोगाने गोठवून टाकले.
हेही वाचा - विनयभंग प्रकरणी जितेंद्र आव्हाडांना मोठा दिलासा, अटकपूर्व जामीन मंजूर शिवसेना कोणाची हे ठरेपर्यंत शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं आहे. यानंतर शिवसेना पक्षाचे नाव, चिन्ह गोठवण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका उद्धव ठाकरेंनी दाखल केली होती. ही याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. हा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का मानला जात आहे.