कोल्हापूर, 9 ऑगस्ट: कर्नाटकातील बेळगावमधील मनगुत्ती गावात पोलिसांना रातोरात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवल्याचा वाद आता पेटला आहे. मनगुत्ती येथील आंदोलन दडपण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केल्याची माहिती समोर आली आहे.
मनगुत्ती गावामध्ये रविवारी मराठी भाषिक महिलांनी आंदोलन केलं. मात्र, कर्नाटक पोलिसांनी हे आंदोलन मोडून काढत आंदोलकांना पांगवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मनगुत्ती गावात पुन्हा एकदा तणाव निर्माण झाला आहे.
हेही वाचा... शिवाजी महाराजांचा पुतळा काँग्रेस आमदारानं हटवला, नितेश राणेंचा खळबळजनक आरोप
पोलिस अधीक्षक निम्बर्गी हे मनगुत्ती गावात दाखल झाले आहेत. गावात सध्या सशस्त्र पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शिवाजी महाराजांचा पुतळा आहे त्या स्थितीत तात्काळ बसवावा, अशी मागणी सीमाभागातल्या मराठी बांधवांनी केली आहे. दरम्यान, याबाबत महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आंदोलन झाली. मात्र, कर्नाटक राज्य सरकार किंवा बेळगाव जिल्हा प्रशासनाकडून याबाबत अद्याप कुठलंही स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही. पोलिसांच्या लाठीचार्जच्या घटनेनंतर मनगुत्ती या गावात तणावपूर्ण शांतता आहे.
शिवरायांचा पुतळा परत बसवण्याची मागणी मराठी भाषिकांनी केली आहे. मात्र, मराठी आंदोलनकर्त्यांवर कर्नाटक पोलिसांनी पुन्हा एकदा अत्याचार सुरू केला आहे.
शिवरायांचा पुतळा हटवल्याचा वाद पेटला, आंदोलन दडपण्यासाठी पोलिसांचा लाठीचार्ज....#shivaji #Karnataka #Belgium pic.twitter.com/kLWVQAYB2Z
— News18Lokmat (@News18lokmat) August 9, 2020
दुसरीकडे, बेळगाव जिल्ह्यातील मनगुत्ती गावातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा रातोरात हटवण्यानंतर आता राजकारण चांगलंच तापलं आहे. शिवाजी महाराजांचा पुतळा हटवण्याप्रकरणी शिवभक्तांनी तिव्र संताप व्यक्त केला आहे. तसेच महाराष्ट्रात कर्नाटक सरकारचा तिव्र निषेध केला जात आहे. त्यात भाजपचे नेते नितेश राणे यांनी या प्रकरणात उडी घेत आगीत आणखी तेल ओतण्याचं काम केलं आहे.
बेळगावात शिवरायांचा पुतळा काँगेस आमदार सतीश जारकीहोळी यांनी हटवला आहे, असा खळबळजनक आरोप नितेश राणे यांनी केली आहे. आता नितेश राणे यांनी केलेल्या आरोपावर काँग्रेस काय स्पष्टीकरण देते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
संजय राऊतांचा देवेंद्र फडणवीसांवर निशाण..
शिवाजी महाराजांचा पुतळा हटवून एक दिवस उलटला तरी अजूनही कोणतीही कारवाई झाली. या प्रकरणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.
कर्नाटकमध्ये भाजपचे सरकार आहे. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेतात आणि भाजपच्या राज्यात शिवरायांचा अवमान होतो, हे खपवून न घेण्यासारखे आहे. भाजपने या प्रकरणावर आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी संजय राऊत यांनी केली. तसेच, कर्नाटक सरकारने शिवाजी महाराजांचा पूर्ण सन्मानाने शिवरायांचा पुतळा पुन्हा तिथे लावण्यात यावा. यासाठी भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी आग्रही भूमिका घ्यायला हवी आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे तिथे जायला तयार आहोत' असा सल्लावजा टोलाही राऊत यांनी फडणवीसांना लगावला.
काय आहे प्रकरण...
बेळगाव जिल्ह्यातील मनगुत्ती गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा बसवण्यात आला होता. विशेष म्हणजे, मनगुत्ती ग्रामपंचायतीच्या परवानगीनं शिवाजी महाराजांच्या पुतळा बसवण्यात आला आहे. मात्र, आता हाच पुतळा कर्नाटक सरकारनं शनिवारी हटवला आहे. त्यामुळे मराठी भाषिकांनी आंदोलन छेडलं आहे.
हेही वाचा...पंढरपूर पोलिस दलात कोरोनाचा पहिला बळी, मुलीचं लग्न न बघताच पोलिस वडिलांचा मृत्यू
सरकारच्या आदेशानंतर रातोरात पोलीस बंदोबस्तात पुतळा हटवण्यात आला. या घटनेनंतर महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील शिवभक्तांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे कर्नाटक सरकारला वावडे का? असा सवाल आता उपस्थित करण्यात येत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Karnataka, Shiv sena, Shivaji maharaj, Shivaji maharaj statue