कोल्हापूर, 23, सप्टेंबर: सुप्रीम कोर्टानं मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर मराठा बांधव नाराज झाले आहेत. मराठा समाजार्फे राज्यभरात आंदोलनं केली जात आहेत. दुसरीकडे, आज (बुधवारी) कोल्हापूर शहरात राज्यस्तरीय मराठा गोलमेज परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. गोलमेज परिषदेत एकूण 15 ठराव सर्व सहमतीनं मांडण्यात आले. त्यावर चर्चा सुरू आहे. गोलमेज परिषदेला राज्यभरातील मराठा समाजाचे नेते मोठ्या संख्येनं उपस्थित होते.
हेही वाचा...धक्कादायक! कोरोनामुळे साहित्य अकादमीचा पुरस्कार विजेत्यावर आली मोलमजुरीची वेळ
गोलमेज परिषदेत एकूण 15 ठराव...
1. मराठा आरक्षणावरील सर्वोच्च न्यायालयातील अंतरिम स्थगिती उठवण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे.
2. मराठा समाजाच्या मुलामुलींचे चालू आर्थिक वर्षांपासून फी परतावा शासनाकडून मिळावा.
3. केंद्र सरकारने आर्थिक दुर्बल घटकांना 10 टक्के आरक्षण दिले. त्याचा लाभ मराठा समाजाला मिळावा.
4. महाराष्ट्र सरकारकडून करण्यात येणाऱ्या मेगा भरतीला स्थगिती द्यावी.
5. सारथी संस्थेला 1000 कोटींची आर्थिक तरतूद करावी.
6. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला 1000 कोटींची तरतूद करावी.
7. राज्यातल्या सर्व जिल्ह्यात मराठा समाजातील मुलामुलींसाठी वसतिगृह तयार करावी.
8. मराठा समाजातील आंदोलकांवरील गुन्हा तत्काळ मागे घ्यावे.
9. मराठा आरक्षण आंदोलनात बलिदान दिलेल्या कुटुंबांना आर्थिक मदत आणि नोकरी मिळावी.
10. राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमुक्ती तसेच आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाचे पुनर्वसन करावे.
11. स्वामिनाथन आयोगाची अमंलबजावणी करावी ही मागणी.
12. अरबी समुद्रातील शिवस्मारकाचे काम तातडीने सुरू करावे.
13. राज्यातील शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी.
14. कोपर्डी प्रकरणातील दोषींच्या शिक्षेची अमंलबजावणी करावी.
15. राज्यातील गड किल्ल्यांचे संवर्धन करण्यासाठी 500 कोटींची तरतूद करावी.
मराठा समाजाची लढ्याची घोषणा...
गोलमेज परिषदमधून पुढच्या आंदोलनाची आणि आरक्षणाबाबतच्या लढ्याची घोषणा केली जाणार आहे. त्यामुळे गोलमेज परिषदेत नेमके कुठले ठराव आज केले जातात, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. दरम्यान मराठा समाजाच्या आजच्या गोलमेज परिषदेनंतर येत्या 2 ऑक्टोबर रोजी कोल्हापूरमध्ये धनगर समाजानेही गोलमेज परिषदेचे आयोजन केले आहे.मराठा समन्वय समितीच्या वतीने कोल्हापूरात महाराष्ट्रातील 48 खासदार व मराठा समाजातील 181 आमदारांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
हेही वाचा...भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता, अनेक बडे नेते राष्ट्रवादीच्या संपर्कात
मराठा आरक्षण मिळविण्यासाठी गेल्या 25 वर्षापासून प्रयत्न चालू आहेत. अनेक आंदोलने, 58 मूक मोर्चे आणि 50 मराठा बांधवांचे बलिदान इतक्या मोठ्या संघर्षानंतर मराठा समाजाला आरक्षण मिळाले. पण आरक्षणाच्या विरोधात काही लोकांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केल्याने आरक्षणाला स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील मराठा समाजातील मुला-मुलींच्या नोकरी व शिक्षणाचे मार्ग बंद झाले आहेत. परिणामी मराठा समाजात असंतोष पसरला आहे. राज्यात वेगवेगळ्या संघटना निषेध करत आहेत. वेगवेगळे आंदोलन करत आहेत.