नाशिक, 17 सप्टेंबर: केंद्र सरकारच्या कांदा निर्यातबंदी निर्णयाच्या विरोधात रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष आणि माजी मंत्री सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्त्वात आंदोलन करण्यात आलं. विंचूर येथे नाशिक-औरंगाबाद राज्य मार्गावर रास्तारोको करत केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला. मात्र, लासलगाव पोलीस ठाण्यात माजी मंत्री सदाभाऊ खोत यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा...मुलीवरून भांडण! तरुणानं पेट्रोल ओतून वडिलांना जिवंत जाळलं, बदलापूर जवळील घटना
राज्यात कोरोनानं थैमान घातलं असताना देखील रस्तावर गर्दी करणे, शासनाच्या मार्गदर्शक तत्वांचे पालन न करणे, या कलमांतर्गत लासलगाव पोलिसांनी सदाभाऊ खोत यांच्यासह कार्यकर्त्यांवर कारवाई केली आहे. पोलिसांनी सदाभाऊ खोत यांच्यासह प्रदेशाध्यक्ष शिवनाथ जाधव आणि 200 ते 250 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
...तर मंत्र्यांना राज्यात फिरू देणार नाही
रयत क्रांती संघटना अध्यक्ष सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्त्वात कांद्रा उत्पादक शेतकऱ्यांनी आजपासून राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिली आहे.
सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्त्वाखाली नाशिक जिल्ह्यातील विंचूर येथे आक्रमक आंदोलन सुरू झालं आहे. देशाच्या सीमेवर रोखलेले सर्व कांद्याचे कंटेनर त्वरीत परदेशात पाठवा नाहीतर एकही केंद्र आणि राज्य सरकारमधील मंत्र्याला फिरू देणार नाही, असा थेट इशारा या आंदोलकांनी दिला आहे.
शेतकऱ्यांचा मुडदा पाडणारा निर्णय...
कांदा निर्यातबंदी निर्णय हा शेतकऱ्यांवर अन्याय करणारा आहे. तसेच शेतकऱ्यांचा मुडदा पाडणारा निर्णय असल्याचं सदाभाऊ खोत यांनी यावेळी सांगितलं. निर्यातबंदी हा सुटाबुटातल्या अधिकाऱ्यांनी घेतलेला निर्णय आहे का? असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला.
सदाभाऊ खोत यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की, केंद्र सरकारचा कांदा निर्यातबंदी निर्णय अन्याय करणारा आहे. सरकारचा हा निर्णय कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अमान्य आहे. शेतकऱ्यांचा हा काळ संकटाचा आहे. या काळात त्यांना मदत द्यायची वेळ आली आणि त्यांच्या तोंडाशी आलेला घास सरकारनं काढून घेतला आहे. मुंबई, मद्रास, बांग्लादेश सीमेवर माल पोचल्यानंतर थांबवणं चुकीचं असल्याचं मत सदाभाऊ खोत यांनी मांडलं.
सदाभाऊ खोत यांनी सांगितलं की, हा माल एक्स्पोर्ट झाला नाही तर सडून जाईल. हा माल तत्काळ एक्स्पोर्ट करण्याची केंद्रानं परवानगी द्यावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. 5 जूनला केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी मुक्त बाजारपेठेची घोषणा केली होती. त्यानंतर शेतकरी आनंदी झाला होता. मात्र, 'एक देश एक बाजारपेठ' अशी केंद सरकारची घोषणा अवघ्या 3 महिन्यांत हवेत विरली, ही शेतकऱ्यांची फसवणूक आहे, असा घणाघात देखील सदाभाऊ खोत यांनी यावेळी केला.
अध्यादेश खरा की मंत्र्याची घोषणा खरी? असा सवाल उपस्थित करत केंद्र सरकारचा निर्णय शेतकऱ्यांचा मुडदा पाडणारा आहे, असं सदाभाऊ खोत यांनी म्हटलं आहे.
दारू पिऊन गाडी चालविल्याने 14000 अपघात; महाराष्ट्राचा आकडा वाचून बसेल धक्का
चक्रीवादळ, लॉकडाऊनमुळं शेतकरी उद्धवस्त...
राज्यात आलेलं चक्रीवादळ आणि कोरोना लॉकडाऊनमुळं शेतकरी आधीच उद्धवस्त झाला आहे. आम्हाला भीक नको न्याय द्या, अन्यथा आंदोलन अजून आक्रमक होईल, असा इशारा सदाभाऊ खोत यांनी मोदी सरकारला दिला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Sadabhau khot