मुंबई, 25 सप्टेंबर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्याबाबत आणखी एक गौप्यस्फोट केला आहे, त्यामुळे नव्या राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. 2014 ते 2019 मध्ये सत्तेत असताना उपमुख्यमंत्रीपद मिळणार होतं, असा दावा एकनाथ शिंदे यांनी केला आहे. लोकसत्ताच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते, त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. ‘2014 सालीच भाजपने शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपद देऊ केलं होतं. तुमच्याकडे एक नवी जबाबदारी येणार आहे, असं देवेंद्र फडणवीस भिवंडीमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात मला म्हणाले होते. शिवसेना हे पद स्वीकारणार नाही, हे मला माहिती होतं, कारण तेव्हा उपमुख्यमंत्रीपद स्वीकारलं असतं, तर ते मला द्यावं लागलं असतं, त्यामुळेच शिवसेनेने तेव्हा उपमुख्यमंत्रीपद नाकारलं,’ असं एकनाथ शिंदे म्हणाले. ‘आम्ही दुसऱ्या पक्षात गेलो नाही, आम्ही दुसरा पक्षही काढला नाही. शिवसेना प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही. ही सगळ्यांनी उभी केलेली शिवसेना आहे. सगळ्यांच्या मेहनतीतून ताकदीतून उभी झालेली शिवसेना आहे. बाळासाहेबांचे विचार आमच्याकडून कोणी हिरावून घेऊ शकत नाही,’ अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिली.
‘बाळासाहेबांनी काँग्रेस-राष्ट्रवादीला जवळ करू नका म्हणलं, केलं कुणी? आम्ही त्यांच्यापासून फारकत घेतली. 50 आमदार आले, हे काही छोटं काम नाही. ही वेळ का आली? एवढ्या मोठ्या प्रमाणावर असंतोष का निर्माण झाला? याचं कारण एका दिवसात तयार झालेलं नाही. जेव्हा राजकारणात एखाद्याच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होतो, एखाद्या पक्षाचा नेता याच्याकडे दुर्लक्ष करतो, तेव्हा अशा घटना घडतात,’ असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.