बीड, 28 सप्टेंबर : एकीकडे मुंबईमध्ये दसरा मेळाव्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यात संघर्ष सुरू असताना, आता बीडमध्ये भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे आणि भगवान गड दसरा मेळावा कृती समितीत संघर्ष सुरू झाला आहे. या संघर्षाचा परिणाम म्हणजे आष्टीतील जय भगवान महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामा देण्यास सुरुवात केली आहे. यामुळे या राजीनामा नाट्यावरून बीड जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मागच्या कित्येक वर्षांपासून सुरू असलेल्या भगवानगडावरील दसरा मेळाव्यावर आता राजकारण सुरू झाले आहे.
भगवान गडावर भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांना महंत नामदेव शास्त्री महाराज यांनी राजकीय भाषण करण्यास विरोध केला होता. आता त्याच भगवान गडाच्या पायथ्याशी मेळावा घेण्यासाठी भगवानगड दसरा मेळावा कृती समितीने पुढाकार घेतलाय.
हे ही वाचा : मुंबईत पदाधिकारी फोडण्याचा शिंदे गटाकडून प्रयत्न, मनसे नेत्याचा गंभीर आरोप
पंकजा मुंडे यांच्या भगवान भक्ती गडावरील दसरा मेळावाला अडसर म्हणुन हा मेळावा असल्याचे समजून अनेक वंजारी समाजातील बांधव नाराज असल्याचं पाहायला मिळतंय. जय भगवान महासंघाचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब सानप यांनी पुढाकार घेऊन समिती स्थापन केलीय. आणि याच माध्यमातून भगवानगडावर दसरा मेळावा होणार आहे.
त्यामुळे आता पंकजा मुंडे आणि या समितीत संघर्ष सुरू झालाय. दसरा मेळावा एकच होईल समाजात फूट पाडण्याचं काम करू नये, अशा भावना व्यक्त करून जय भगवान महासंघाच्या आष्टी येथील सर्व पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिलाय. त्यामुळे आता हा संघर्ष आणखी पेटण्याची चिन्ह निर्माण झाली आहे. दरम्यान यावर आता पंकजा मुंडे काय भुमीका घेतात याकडे लक्ष द्यावे लागेल.
पंकजा मुंडे दुसऱ्या एका मुद्दावरून चर्चेत
भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्या अंबाजोगाई येथे झालेल्या भाषणावरून एक वादंग उठले. या भाषणात वंशवादावरील मुद्दा व ‘मोदी मला संपवू शकणार नाहीत’ अशा प्रकारच्या एका विधानावरून प्रसार माध्यमात मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू आहेत. यावर क्रिया -प्रतिक्रिया उमटत असताना याबाबत संपूर्ण भाषणाचा व्हिडिओ पोस्ट करत पंकजा मुंडे यांनी आपल्या भाषणातील केवळ अर्धवट एक ओळच वापरून विनाकारण नकारात्मक अर्थ पसरविला जात असल्याचे म्हटले आहे.
हे ही वाचा : संघावर बंदीची मागणी करणाऱ्या काँग्रेस नेत्याला फडणवीसांनी फटकारलं, म्हणाले…
पंकजा मुंडे यांनी अंबाजोगाई येथे आयोजित करण्यात आलेल्या बुद्धिजीवी संमेलन कार्यक्रमात उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी केल्या भाषणात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत ‘मोदी मला संपवू शकत नाहीत’ असे वक्तव्य केल्याच्या बातम्या दाखवण्यात आल्या. पण मुंडे यांनी या अनुषंगाने “चांगले काम केले तर मोदीजी सुद्धा पराभव करु शकणार नाहीत “ हा बोलण्याचा मतितार्थ असल्याचे आज सांगितले आहे. याबाबतचा संपूर्ण व्हिडीओ पोस्ट करत त्यांनी आपली प्रतिक्रिया ट्विटर व अन्य सोशल माध्यमातून व्यक्त केली आहे.