औरंगाबाद, 27 जानेवारी : मराठवाडा तसंच पर्यटनाची राजधानी म्हणून औरंगाबाद शहराची ओळख आहे. येथून जवळच असलेली अजिंठा-वेरुळ लेणी पाहण्यासाठी अनेक देशी-विदेशी पर्यटक दरवर्षी औरंगाबादमध्ये येत असतात. यामध्ये रेल्वेनं येणाऱ्या पर्यटकांची मोठी संख्या आहे. यावर्षी सादर होणाऱ्या आर्थिक बजेटमध्ये रेल्वे विभागाकडून भरीव तरतुदीची औरंगाबादकरांना अपेक्षा आहे.
काय आहे मागणी?
औरंगाबादला जोडणाऱ्या रेल्वे गाड्यांच्या संख्येत वाढ झाली असली तरी प्रवासासाठी एकच मार्ग आहे. रेल्वे विभागानं यासाठी व्हिजन 2030 तयार केलंय. त्याची अंमलबजावणी यावर्षीपासूनच सुरू व्हावी. शहरात येणाऱ्या मालगाड्यांची संख्याही आता वाढलीय. त्याचबरोबर प्रवाशी रेल्वेची कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी दुहेरी मार्ग आवश्यक आहे, असं मत रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष राजकुमार सोमाणी यांनी व्यक्त केली आहे.
Union Budget 2023 : बजेटनंतर सोन्याचे भाव कमी होणार की वाढणार? पाहा Video
'औरंगाबादची देशाच्या अन्य भागाशी असलेली कनेक्टेव्हिटी वाढवण्याची मागणीही सोमाणी यांनी केली. औरंगाबादहून लखनौ, कानपूर, जम्मू, तसंच राजस्थानमधील जोधपूरला थेट रेल्वे सुरू करण्यात यावी. त्याचबरोबर पूर्व भारतामधील कोलकाता पाटणा ही शहरं देखील औरंगाबादशी रेल्वेनं जोडणं आवश्यक आहे.
कोल्हापूर- धनबाद ही सम्येद शिखरला जाणारी महत्त्वाची गाडी होती. या गाडीचा मार्ग बदलण्यात आलाय. त्यामुळे औरंगाबादहून नवीन गाडी सुरू करावी त्याचा मराठवाड्यातील भाविकांना मोठा फायदा होईल,' असं सोमाणी यांनी सांगितलं. त्याचबरोबर मनमाड ते परभणी हा दुहेरी मार्ग लवकरात लवकर सुरू करावा अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Aurangabad, Budget 2023, Indian railway, Local18