अमरावती, 05 मार्च : मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे. या प्रकरणी मुंबईत 2 जणांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणावर पहिल्यांदाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली असून लवकरच सत्य बाहेर येईल, असं सूचक विधान केलं आहे.
भारतीय जनता पक्षाचे सरकार हे सरकारी यंत्रणांचा गैरवापर करत असल्याच पत्र 9 राज्यातील विरोधी पक्ष नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नुकतेच लिहिले आहे. यावर अमरावतीत बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, कोणत्याही यंत्रणांचा गैरवापर होत नसून ज्यांनी गैरमार्गाने पैसे कमावलेले आहेत त्यांच्यावरच कारवाई होत आहे, न्याय मिळत नसेल तर न्यायालय आहे, विरोधी पक्ष नेत्यांनी यंत्रणांचा असा गैरवापर झाला असल्यास ते उदाहरण दाखवावे असे देखील राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.
(सुप्रिया सुळेंनी मोडला पवारांचा नियम, मटण खाऊन मंदिरात गेल्याचा शिवसेनेचा आरोप)
'विरोधी पक्षातून भाजपमध्ये आला तर त्यांची चौकशी बंद होते, यावर विरोधी पक्षाने नाव सांगावे.. कुणाचीही चौकशी बंद झाली नाही, भाजपमध्ये असाल किंवा कुठेही असाल, चौकशी काही बंद होत नाही, असंही देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केला.
(ईडीची पिडा, हसन मुश्रीफ यांची हायकोर्टाने धाव)
संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला झाला. या प्रकरणी काही आरोपींना ताब्यात घेतले आहे. देशपांडे यांनीही आपली बाजू मांडली आहे. या प्रकरणी लवकरच सत्य बाहेर येईल, असं फडणवीस म्हणाले.
दरम्यान, मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्यावर शुक्रवारी सकाळी शिवतीर्थावर मॉर्निग वॉकला गेले असता हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात संदीप देशपांडे यांचा हात फ्रॅक्चर झाला आहे. या प्रकरणाचा सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी तपास केला. अखेर या प्रकरणी दोन जणांना ताब्यात घेतले आहे. हे दोघे जण भांडुप पश्चिम भागातील रहिवासी असल्याची माहिती सूत्रांनी दिली. पोलीस इतर संशयितांचा शोध घेत आहेत. ताब्यात घेण्यात आलेल्या संशयितांपैकी सोळंकी असे एका संशयिताचे नाव असून तो शिवसेनेचा कार्यकर्ता असल्याचे सांगण्यात येत आहे. राजकीय वादातून हल्लेखोरांनी हल्ला केल्याचे चौकशीत पोलिसांना समजले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.