मुंबई, 3 फेब्रुवारी : सत्ता गेल्याचं शल्य राजकीय नेत्यांना कायम बोचत राहतं. 2014 साली राज्यातली सत्ता पृथ्वीराज चव्हाणांमुळे गेल्याचा थेट आरोप अजित पवार यांनी केला आहे. अजित पवारांच्या या आरोपांमुळे काँग्रेस-राष्ट्रवादीमधलं अंतर वाढण्याची शक्यता आहे, कारण काँग्रेसनेही अजित पवारांच्या आरोपांवर पलटवार केला आहे.
काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकार असताना तत्कालिन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फारसं सख्य नव्हतं. पृथ्वीराज चव्हाण जलद निर्णय घेत नसल्यामुळे राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची मोठी अडचण झाली होती, त्यामुळे शरद पवारांनी त्यावेळी कठोर शब्दात टीका केली होती. आताच्या लोकांना निर्णय घेताना हाताला लकवा भरतो काय? निर्णय वेळेत घेतले जात नाहीत, अशा शब्दात शरद पवारांनी टीका केली होती.
आता 9 वर्षांनंतरही राष्ट्रवादी काँग्रेसच्या भूमिकेत फारसा बदल झाल्याचं दिसत नाही. पृथ्वीराज चव्हाणांमुळे 2014 साली सरकार गेल्याचं वक्तव्य अजित पवार यांनी केलं. पृथ्वीराज चव्हाण डायरेक्ट दिल्लीहून आल्याने त्यांना आमदारकीचाही अनुभव नव्हता. दुर्दैवाने काँग्रेस आणि आमच्यात दुरावा निर्माण झाला आणि पुढे फटका बसल्याचं अजित पवारांनी सांगितलं.
अजित पवारांनी पृथ्वीराज चव्हाणांवर टीकेचे बाण सोडल्यानंतर काँग्रेसने जशास तसं उत्तर दिलं आहे. 'आमच्या हायकमांडने घेतलेला निर्णय राज्याच्या आणि पक्षाच्या हितासाठी केलेला आहे, त्यामुळे अशी प्रतिक्रिया त्यांना देता येणार नाही,' असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले आहेत.
काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची आता महाविकासआघाडी झाली आहे. महाविकासआघाडी झाल्यानंतर त्यांच्यातल्या मतभेदांचाही महाविकास झाल्याचं पाहायला मिळत आहे, त्यामुळे आगामी निवडणुकांच्या तोंडावर हे मतभेद महाविकासआघाडीला महागात पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ajit pawar, Congress, NCP, Prithviraj Chavan