मुंबई, 8 ऑक्टोबर : दरवर्षीप्रमाणे शाळा त्यांचे प्रवेश प्रक्रिया अर्ज देत डिसेंबर महिन्यात प्रक्रिया सुरू करतील. परंतु, प्रवेश प्रक्रियेचे हे काम आता मुलांच्या आधार कार्डावर येऊन थांबले आहे. प्रवेश घेताना इतर कागदपत्रांसोबतच आधार कार्ड असणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. अन्यथा तुमच्या मुलाच्या प्रवेश प्रक्रियेत अडथळा येण्याची शक्यता आहे. हा नियम या वर्षीपासून प्रत्येक शाळेने त्यांच्या प्रवेश प्रक्रियेत लागू केला आहे.
जर अजूनही तुमच्या मुलांकडे त्याचे स्वतःचे आधार कार्ड नसेल तर ही गोष्ट त्याच्या प्रवेश प्रक्रियेत अडथळा आणू शकते. शाळांच्या नवीन नियमावलीनुसार प्रवेश घेण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याकडे आधार कार्ड असणं बंधनकारक आहे. सध्याच्या घडीला नवजात बाळाचे सुद्धा आधार कार्ड काढले जाते. म्हणूनच शाळांनी प्रवेश घेण्यासाठी आधार कार्ड गरजेचे आहे असा नियम काढला आहे.आधार कार्ड हा सगळ्यात महत्त्वाचा पुरावा आहे. व भारतातील प्रत्येक नागरिकांकडे तो असणे गरजेचे आहे. म्हणूनच प्रवेश अर्ज भरताना आता इतर कागदपत्रांसोबत आधार कार्ड असणे सुद्धा तितकेच आवश्यक आहे.
जसे 18 वर्षांवरील व्यक्तींचे आधार कार्ड अर्ज भरले जातात तसेच आता लहान मुलांचे सुद्धा भरले जातात. पालकांनी आपल्या मुलांना जवळच्या आधार कार्ड केंद्रावर नेऊन अर्ज भरायचा आहे. पाच वर्षांखालील मुलांसाठी बायोमॅट्रिक प्रक्रिया घेतली जाणार नाही. मुलांचा फोटो काढून त्यांच्या पालकांच्या UID शी मुलांचे आधार कार्ड जोडले जाणार आहे. यासाठी पालकांचं आधार कार्ड असणंसुद्धा तितकंच आवश्यक आहे.
तसंच पाच ते 15 वर्षांमधील मुलांना फोटो आणि बायोमेट्रिक करणं अनिवार्य आहे. या वयोगटांतील मुलांची प्रक्रिया ही प्रौढांच्या प्रक्रियेसारखीच आहे. बायोमॅट्रिक पद्धतीने हाताच्या 10 बोटांचे ठसे, आयरिस (डोळ्यांचं स्कॅनिंग), फोटोग्राफ घेतला जातो.
मुलांच्या आधार कार्ड अर्जासाठी आवश्यक कागदपत्रं
मुलांच्या आधार कार्ड अर्जासाठी मुलांचा जन्म दाखला, आई-वडिलांचं ओळखपत्र आणि निवासी पुरावा असणं आवश्यक आहे.