मुंबई, 27 नोव्हेंबर : अभिनेत्री कंगना रनौतच्या (kangana ranaut) कार्यालयावर तोडकाम केल्या प्रकरणी उच्च न्यायालयाने (bombay high court) मुंबई पालिकेचा (mumbai municipal corporation) निर्णय बेकायदेशीर ठरवला आहे. कंगनाने न्यायालयाचे आभार मानत हा लोकशाहीचा विजय आहे, असं म्हणत स्वागत केले आहे.
आपल्या कार्यालयावर केलेल्या तोडकाम कारवाईच्या विरोधात कंगनाने पालिकेत याचिका दाखल केली होती. अखेर न्यायालयाने कंगनाच्या कार्यालयावरील कारवाई बेकायदेशीर असल्याचा ठपका ठेवला आहे. कंगना रनौतने ट्वीट करून मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.
When individual stands against the government and wins, it’s not the victory of the individual but it’s the victory of the democracy.
Thank you everyone who gave me courage and thanks to those who laughed at my broken dreams.
'जेव्हा एखादी व्यक्ती सरकारच्या विरोधात उभी राहते आणि जिंकते तेव्हा तो विजय हा व्यक्तीचा नसून तो लोकशाहीचा विजय आहे. ज्यांनी मला धैर्य दिले त्या प्रत्येकाचे आभार आणि ज्यांनी माझ्या तुटलेल्या स्वप्नांचा उपहास केला त्यांचेही आभार' अशी प्रतिक्रिया कंगनाने दिली.
तसंच, 'तुम्ही एक खलनायक म्हणून काम केले त्यामुळेच मी एक हिरो होऊ शकले', असा टोलाही कंगनाने ठाकरे सरकारला लगावला.
दरम्यान, न्यायाधीश शाहरुख काथावाला व न्यायाधील रियाझ छागला यांनी कंगनाची सुद्धा कानउघडणी केली आहे. 'मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी करणे, व्यक्तींविरोधात आक्षेपार्ह विधाने करणे, सरकारच्या विरोधात विधाने करणे या कंगनाच्या कृतीला हायकोर्ट मान्यता देत नाही. त्याच्याशी हायकोर्ट सहमत नाही. कंगनाने भविष्यात असे ट्विट करण्यापासून स्वतःला रोखावे' अशी शब्दांत हायकोर्टाने कंगनाला समज दिला आहे.
'कोणत्याही नागरिकाने बेजबाबदार वक्तव्ये केली तर त्याकडे सरकार व प्रशासनाने दुर्लक्ष करणेच सोईस्कर आहे. बेजबाबदार वक्तव्ये करून कितीही मूर्खपणा केला, ती वक्तव्ये कितीही त्रासदायक असली तरी सरकारी प्रशासने त्याविरोधात कायद्याच्या चौकटीबाहेर जाऊन व कु-हेतूने कारवाई करू शकत नाही, असंही हायकोर्टाने पालिकेला बजावले आहे.
महापालिकेने बजावलेली नोटीस आणि त्यानंतर तोडकामाचा काढलेला आदेश दोन्ही हायकोर्टाने रद्दबातल केले आहे. तो बंगला राहण्यायोग्य होण्यासाठी महापालिकेला काम करून द्यावे लागेल, असे आदेशही हायकोर्टाने पालिकेला दिले आहे.
काय आहे प्रकरण?
मुंबई पाकव्याप्त भाग आहे आणि मुंबई पोलिसांबद्दल वक्तव्य केल्यामुळे शिवसेना Vs कंगना असा वाद पेटला होता. या वादाला 9 सप्टेंबर रोजी नवीन वळण मिळाले. मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी पाली हिल वांद्रे परिसरातील कार्यालयावर हातोडा चालवला.
कंगनाने आपल्या कार्यालयाच्या समोर अनधिकृतरित्या स्लॅबही उभारला आणि दुसऱ्या मजल्यावर अनधिकृत बाल्कनी उभारली. तसंच कंगनाने आपल्या ऑफिसच्या पहिल्या मजल्यावर अनधिकृत शौचालय उभारले. देवघर आणि लिव्हिंग रुममध्ये अनधिकृत केबिन आणि लाकडी पार्टिशन तयार केले, असल्याचा ठपका पालिकेनं ठेवला होता. त्याचबरोबर, तळ मजल्यावर अनधिकृतरित्या किचन, ग्राऊंड फ्लोअरवर पायऱ्यांवर बेकायदेशीररित्या शौचालय उभारण्यात आल्याचा दावाही पालिकेनं केला होता.
कंगनाने हे ऑफिस मनिकर्निका सिनेमाच्या आधी उभारले होते. पण, यात बरेच बांधकाम हे अधिकृत असल्याचे समोर आले होते. त्यामुळे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी आधी कंगनाला नोटीस बजावली होती. त्यानंतर 9 सप्टेंबर रोजी जेसीबी चालवून थेट कारवाई केली होती.