मुंबई, 14 फेब्रुवारी- आज जगभरात प्रेमाचा दिवस अर्थातच व्हॅलेंटाइन्स डे साजरा केला जात आहे. प्रेमी जोडपे विविध पद्धतीने आपल्या जोडीराला सरप्राईज देण्याचा आणि त्यांना आपल्या आयुष्यातील महत्व पटवून देण्याचा प्रयत्न करत आहेत.प्रेम, व्हॅलेंटाईन्स डे या गोष्टीचा विचार केला तर सर्वात आधी आपल्या समोर मनोरंजन सृष्टीतील अनेक जोड्या डोळ्यांसमोर येतात. या जोडप्यांनी खरं प्रेम काय असतं हे दाखवून दिलं आहे. यामधीलच एक म्हणजे बॉलिवूडचा सिंघम अजय देवगण आणि अभिनेत्री काजोल यांची जोडी होय. अभिनेता अजय देवगण आणि प्रसिद्ध अभिनेत्री काजोल हे बॉलिवूडमधील पॉवर कपल्सपैकी एक आहेत. दोघांची लव्हस्टोरीही खूपच रंजक आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, जेव्हा अजय पहिल्यांदा काजोलला भेटला होता, तेव्हा त्याला काजोलला पुन्हा भेटण्याची इच्छा नव्हती. चला तर मग आज आम्ही तुम्हाला सांगतो की या दोघांचं लग्न नेमकं कसं झालं.अजय देवगण आणि काजोलची जोडी मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. आणि त्यानंतर या दोघांची रील केमेस्ट्री खऱ्याखुऱ्या लव्हस्टोरीमध्ये रुपांतरीत झाली होती. 1999 मध्ये अजय आणि काजोलने लग्नगाठ बांधली होती. लग्न झाल्यापासून आजतागायत दोघांचंही आयुष्य खूप आनंदात जात आहे. या दोघांमध्ये अतिशय सुंदर बॉन्डिंग आहे. काजोल आणि अजय सतत एकमेकांची चेष्टामस्करी करत असतात. या जोडप्याला मुलगी न्यासा आणि मुलगा युग अशी दोन अपत्ये आहेत. (हे वाचा: Madhubala Birthday: व्हॅलेंटाईन डे दिवशीच जन्म,पण आयुष्यभर पाहिली प्रेमासाठी वाट,मधुबाला-दिलीप कुमारांची अजब लव्ह स्टोरी ) काजोल आणि अजय देवगणची लव्हस्टोरी एखादया चित्रपटापेक्षा कमी नाहीय. मीडिया रिपोर्ट्सनुसार, काजोल आणि अजय देवगणची पहिली भेट फारशी चांगली नव्हती आणि त्यामुळेच अजयला काजोलला पुन्हा भेटण्याची इच्छा नव्हती.अमर उजालाच्या रिपोर्ट्सनुसार, अजय देवगणने त्याच्या एका मुलाखतीत सांगितले होते की, काजोल आणि त्याचं प्रेम हे पहिल्या नजरेतलं प्रेम नव्हतं. काजोल आणि अजय देवगण यांची पहिली भेट 1995 मध्ये आलेल्या ‘हलचल’ चित्रपटाच्या सेटवर झाली होती.यामध्ये दोघे मुख्य भूमिका साकारत होते. काजोल नेहमीच आनंदी आणि हसत-खेळत राहणारी मुलगी आहे. त्यामुळेच या चित्रपटाच्या सेटवर ती नेहमीच मोठमोठ्याने हसायची, विनोद करायची आणि मजामस्ती करायची. तर दुसरीकडे, अजय देवगण पूर्णपणे तिच्या विरुद्ध स्वभावाचा होता. तो खूपच शांत होता. याच कारणामुळे अजयला काजोलची स्टाईल आवडली नव्हती आणि त्यामुळेच त्याला काजोलला पुन्हा भेटायचं नव्हतं. परंतु शूटिंगदरम्यान अजय आणि काजोल यांच्यातील जवळीता वाढल्याचा दावा काही रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे. खरं तर, या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान काजोल नेहमी अजयशी तिच्या एक्स बॉयफ्रेंडबद्दल बोलायची आणि अशा परिस्थितीत काय करायचं याचा सल्ला अजय नेहमी तिला द्यायचा आणि मग हळूहळू दोघेही जवळ आले होते.
काही काळ एकमेकांना डेट केल्यानंतर अजय आणि काजोलने लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांच्या लग्नाची बातमी मीडियात प्रसिद्ध व्हावी, अशी दोघांची इच्छा नव्हती, त्यामुळे या दोघांनी आपल्या घराच्या टेरेसवर लग्न केलं होतं. हे लग्न अगदी साध्या पद्धतीने पार पडलं होतं. काजोल आणि अजयने ‘प्यार तो होना ही था’, ‘इश्क’, ‘यू मी और हम’, ‘दिल क्या करे’, ‘राजू चाचा’ आणि ‘गुंडाराज’ अशा अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे.