मुंबई, 02 मे: एखाद्या वास्तविक घटनेवर आधारित चित्रपट तयार केला की, तो वादात अडकणं यात काही नवीन नाही. आत्तापर्यंत शेकडो चित्रपट काहीना काही कारणांमुळे वादग्रस्त ठरले आहेत. सध्या ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. येत्या 5 मे रोजी हा चित्रपट रिलीज होणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासूनच हा चित्रपट वादात अडकला असून, रिलीज डेट जसजशी जवळ येत आहे, तसतसा हा वाद वाढत आहे. ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटाप्रमाणेच ‘द केरळा स्टोरी’ या चित्रपटाबाबतही अनेक सामाजिक आणि राजकीय प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. सहा दिवसांपूर्वी म्हणजेच 26 एप्रिल रोजी रिलीज झालेला ‘द केरळा स्टोरी’ या चित्रपटाचा ट्रेलर आतापर्यंत 1.4 कोटींहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. एका गटाच्या मते हा चित्रपट एक प्रोपोगंडा फिल्म आहे तर दुसऱ्या गटाच्या मते यातून केरळमधील वास्तव परिस्थिती दाखवण्यात आली आहे. ‘द केरळ स्टोरी’च्या ट्रेलरमध्ये ब्रेन वॉश, लव्ह जिहाद, हिजाब आणि आयएसआयएससारखे शब्द वापरण्यात आले आहेत. असा दावा करण्यात आला आहे की, केरळमधील 32 हजार बेपत्ता हिंदू आणि ख्रिश्चन मुलींची ही कथा आहे. ज्यांचं ब्रेनवॉश करून त्यांना इस्लाम स्वीकारण्यास भाग पाडलं गेलं आणि नंतर त्यांना आयएसआयएसचं दहशतवादी बनवलं गेलं. हेही वाचा - ‘मी दुबईत मोकळेपणाने फिरू शकतो पण…’; Y+ सिक्युरिटी विषयी पहिल्यांदा बोलला भाईजान हा ट्रेलर पाहिल्यानंतर प्रेक्षकांच्या मनात चित्रपटाच्या कथेबाबत काही प्रश्न निर्माण झाले आहेत. केरळमध्ये हिंदू आणि ख्रिश्चन मुली व महिलांना खरोखर फूस लावण्यात आली आहे का? 32 हजार हिंदू आणि ख्रिश्चन मुलींना खरोखर आयएसआयएस या दहशतवादी संघटनेत भरती करून घेतलं आहे का? असे हे प्रश्न आहेत. ट्रेलरमध्ये काय दाखवण्यात आलं? ‘द केरळा स्टोरी’ चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये मल्याळम अभिनेत्री अदा शर्मा मुख्य भूमिकेत दिसत आहे. या चित्रपटात अदानं शालिनी उन्नीकृष्णन नावाच्या हिंदू कुटुंबातील मुलीची भूमिका साकारली आहे. काही लोक शालिनीचं धर्मांतर करतात आणि तिला फातिमा नावानं नवीन ओळख देतात, असं ट्रेलरमध्ये दाखवण्यात आलं आहे. बुरखा घातलेली फातिमा आपली गोष्ट सांगताना दिसत आहे. ती म्हणते, “मी हिंदू होते. माझं नाव शालिनी उन्नीकृष्णन होतं. आता मला फातिमा या नावानं ओळखलं जातं. मला नर्स व्हायचं होतं. पण आता मी अफगाणिस्तानात आयएसआयएसच्या एका दहशतवादी तुरुंगात आहे. माझ्यासारख्या 32 हजार मुली आहेत ज्यांचं धर्मांतरकरून सीरिया आणि येमेनमध्ये पाठवण्यात आलं आहे. सर्वसामान्य मुलींना दहशतवादी बनवण्याचा धोकादायक खेळ केरळमध्ये उघडपणे सुरू आहे.” हेही वाचा - SS Rajamouli: पाकिस्तानने परवानगी नाकारल्याने अधुरं राहिलं एसएस राजामौलींच ‘ते’ स्वप्न; काय आहे नेमकं प्रकरण? माजी मुख्यमंत्र्यांच्या रिपोर्टमधूनच मिळाली आकडेवारी ‘द केरळा स्टोरी’चे निर्माते विपुल अमृतलाल शाह यांना चित्रपटात नमूद केलेल्या 32 हजार मुलींच्या धर्मांतराच्या आकडेवारीबाबत माहिती विचारण्यात आली असता ते म्हणाले की, 2010 मध्ये केरळचे तत्कालीन मुख्यमंत्री ओमन चंडी यांनी विधानसभेत एक अहवाल सादर केला होता. ज्यात त्यांनी सांगितलं होतं की, त्यांच्या कार्यकाळात दरवर्षी सुमारे 2,800 ते 3,200 मुली इस्लाम धर्म स्वीकारत आहेत. म्हणजेच पाच वर्षांत 7800 हून अधिक मुलींची धर्मांतरं झाली. यावरून पुढील 10 वर्षांचा हिशेब केला असता ही संख्या 30 ते 32 हजार होते. फॅक्ट चेकर वेबसाइट ऑल्ट न्यूजशी बोलताना चित्रपटाचे दिग्दर्शक, सुदीप्तो सेन यांनी या आकडेवारीबाबत असाच दावा केला आहे. सेन म्हणाले की, ही आकडेवारी आम्ही तयार केली नसून, माजी मुख्यमंत्री ओमन चंडी यांनीच जाहीर केलेली आहे. काय म्हणाले होते ओमान चंडी? विविध माध्यमांनी दिलेल्या वृत्तांवर विश्वास ठेवला तर, केरळचे तत्कालीन मुख्यमंत्री ओमन चंडी यांनी 2010 मध्ये नव्हे तर जून 2012 मध्ये कोर्टात या विषयाबाबत वक्तव्य केलं होतं. इंडिया टुडेनं दिलेल्या एका बातमीनुसार, ‘25 जून 2012 रोजी केरळचे तत्कालीन मुख्यमंत्री ओमन चंडी यांनी विधानसभेत सांगितलं की, 2006 पासून राज्यातील 2,667 मुलींनी इस्लाम धर्म ‘स्वीकारला’ आहे.’ त्या निवेदनात दरवर्षी 2,667 मुलींचं ‘धर्मांतर’ होत असल्याचा उल्लेख नाही. ओमान यांनी विधानसभेत मांडलेली आकडेवारी सुमारे साडेसहा वर्षे जुनी होती. म्हणजेच 2006 ते 2012 या साडेसहा वर्षांच्या कालावधीत केरळमध्ये 2,667 मुलींनी इस्लाम धर्म स्वीकारला होता. या शिवाय, या महिला-मुलींच्या सीरियात जाण्याबद्दल किंवा आयएसआयएस या दहशतवादी संघटनेत सामील झाल्याबाबत त्यांनी काहीही सांगितलं नव्हतं. म्हणजे चित्रपटात केलेल्या दाव्यानुसार, केरळमधील एकूण 32 हजार मुलींनी इस्लाम धर्म स्वीकारला किंवा त्या आयएसआयएसमध्ये सामील झाल्याचा कोणताही पुरावा नाही. ‘द केरळ स्टोरी’चा अजेंडा काय आहे? एबीपी लाइव्हला दिलेल्या मुलाखतीदरम्यान, विपुल शाह यांना चित्रपटाच्या अजेंड्याबाबत निर्माण झालेल्या वादावर प्रतिक्रिया विचारली असता ते म्हणाले की, ‘हा चित्रपट तीन मुलींच्या सत्यकथेवर आधारित आहे. जर तीन मुलींची सारखीच गोष्ट असेल तर हा फेक अजेंडा कसा असू शकतो? याचं उत्तर टीकाकारांपैकी कोणीही देऊ शकत नाही. चित्रपटातून द्वेष पसरवण्याचा प्रयत्न - पिनाराई विजयन चित्रपटातील वस्तुस्थितीबाबत काँग्रेससह इतर अनेक पक्षांच्या नेत्यांनी हा चित्रपट केवळ एक अजेंडा असल्याचा आरोप केला आहे. चित्रपटाच्या माध्यमातून समाजातील शांतता बिघडवण्याचा प्रयत्न केला जात आहे. केरळचे सध्याचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनीदेखील रविवारी ‘द केरळ स्टोरी’च्या निर्मात्यांवर टीका केली. पीटीआयनं दिलेल्या वृत्तानुसार मुख्यमंत्री म्हणाले की, ‘लव्ह जिहाद’चा मुद्दा उपस्थित करून चित्रपट निर्माते संघ परिवाराच्या विचारांच्या प्रचाराला चालना देत आहेत. ‘लव्ह जिहाद’ ही अशी संकल्पना आहे, जी गृह मंत्रालय, न्यायालयं तसंच तपास यंत्रणांनी नाकारली आहे. चित्रपटाचा ट्रेलर बघितल्यानंतर असं निदर्शनास येतं की, राज्याची प्रतिमा मलिन करण्याचा आणि जातीय ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न होत आहे. हेही वाचा - Salman Khan: मुलींबाबत केलेल्या त्या नियमावर अखेर सलमान खानने सोडलं मौन; म्हणाला, ‘महिलांनी अंगभर कपडेच…’ चित्रपट बघितल्यानंतर प्रतिक्रिया द्यावी-विपुल शाह चित्रपटातील कलाकार आणि निर्मात्यांनी चित्रपटाचा बचाव करण्यास सुरुवात केली आहे. प्रत्येकानं चित्रपट बघावा आणि त्यानंतर मत मांडावं, असं त्यांचं म्हणणं आहे. चित्रपटात मुख्य भूमिकेत साकारणारी अदा शर्मा एएनआयशी बोलताना म्हणाली, “या चित्रपटात दाखवण्यात आलेलं मुलींचं आयुष्य ही एक भयकथा आहे. याला प्रोपोगंडा म्हणणं किंवा बेपत्ता मुलींच्या संख्येबद्दल चुकीचं बोलणं अधिक भीतीदायक आहे. मला असं वाटतं की लोकांनी अगोदर बेपत्ता मुलींबद्दल बोललं पाहिजे आणि नंतर आकडेवारीचा विचार केला पाहिजे.”
अदा शर्मानं असा दावाही केला आहे की, ज्या मुलींची कथा या चित्रपटात दाखवण्यात आली आहे त्यांना ती भेटली होती. ती म्हणाली, “मी अशा काही मुलींना भेटले आहे. त्यांच्या भावना मी शब्दात सांगू शकत नाही. एक किंवा दोन ओळींमध्ये त्यांनी सहन केलेल्या वेदनांना न्याय देता येणार नाही.” दिग्दर्शक सुदिप्तो सेन यांनी अनेक मुलाखतींमध्ये सांगितलं आहे की, या चित्रपटाच्या कथेवर काम करताना सात वर्षे रिसर्च केला गेला आहे. यादरम्यान अनेक पीडित मुलींची भेट घेऊन आणि त्यांच्या मुलाखती घेतल्या गेल्या आहेत. निर्माते विपुल शाह म्हणतात की, " धार्मिक कट्टरवाद हा आपल्या देशातील महिलांसाठी किती मोठा धोका आहे, हे या चित्रपटातून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. या शिवाय, भारताविरुद्ध रचल्या जात असलेल्या षडयंत्राबद्दल जागरूकताही निर्माण करण्याचा प्रयत्न या चित्रपटातून केला गेला आहे." शशी थरूर यांनी केला विरोध 30 एप्रिल रोजी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांनीही या चित्रपटाबाबत एक ट्विट केलं आहे. “ही तुमच्या केरळची गोष्ट असू शकते, पण ती आमच्या केरळची गोष्ट नाही…,” असं ट्विट थरूर यांनी केलं आहे. बीजेपीने चित्रपटाला दिला पाठिंबा भारतीय जनता पार्टीच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी चित्रपटाबाबत एक ट्विट केलं आहे. ट्विटमध्ये ते म्हणाले की, “द केरळ स्टोरी वास्तविक जीवनातील कथांवर आधारित आहे. हा धक्कादायक आणि अस्वस्थ करणारा चित्रपट आहे.” मालवीय पुढे म्हणाले, “केरळचं वेगात होणारं इस्लामीकरण आणि इस्लामिक स्टेटच्या फायद्यासाठी निष्पाप मुलींना कसं फसवलं जात आहे, याचं चित्रण या चित्रपटात आहे. लव्ह जिहाद वास्तविक आणि धोकादायक आहे. हा धोका ओळखला पाहिजे.” हा चित्रपट 5 मे रोजी प्रदर्शित होत आहे. अशा परिस्थितीत ‘द केरळ स्टोरी’मधील आकडे कितपत योग्य आहेत, याचा पुरावा तपासानंतरच समोर येईल. मात्र, सध्या तरी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर पुन्हा एकदा वातावरण निर्मिती केली आहे. हा चित्रपट ‘द काश्मीर फाइल्स’प्रमाणे कमाई करेल की फ्लॉप होईल, हे पुढील काही दिवसांत समजेल.