मुंबई, 08 सप्टेंबर : मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदे हा सतत वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारत असतो. तो यशवर्धन चौधरी म्हणून टेलिव्हिजन तर गाजवत आहेच. पण येणाऱ्या काळात मोठा पडदा गाजवायला देखील श्रेयस सज्ज झाला आहे. आता तो पुन्हा एकदा बॉलिवूडच्या नव्या कोऱ्या चित्रपटातून वेगळ्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर येणार आहे. कंगना रणौतचा ‘इमर्जन्सी’ या चित्रपटात श्रेयस अटल बिहारी वाजपेयी यांची भूमिका साकारणार आहे. नुकतीच श्रेयस तळपदेनं न्यूज 18 लोकमतच्या बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी कार्यलयात भेट दिली. श्रेयसच्या हस्ते बाप्पाची आरती करण्यात आली. त्यावेळी त्याने या भूमिकेमागचा एक किस्सा न्यूज 18 लोकमतच्या ‘बाप्पा विथ गप्पा’ या कार्यक्रमात सांगितला. बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतचा ‘इमर्जन्सी’ हा चित्रपट सध्या प्रचंड चर्चेत आहे. आणीबाणीच्या काळावर आधारित हा चित्रपट आहे. या चित्रपटात मराठमोळा अभिनेता श्रेयश तळपदे अटल बिहारी वाजपेयी यांची भूमिका साकारणार आहे. त्याचा एक लूक समोर आला होता. त्याचे कौतुक झाले होते. पण आधी त्याला कंगनाने वेगळ्याच भूमिकेसाठी विचारले होते. याबद्दल श्रेयसने न्यूज 18 लोकमतच्या ‘बाप्पा विथ गप्पा’ या कार्यक्रमात पहिल्यांदाच खुलासा केला आहे. हेही वाचा - Shreyas Talpade Exclusive: एकेकाळी बाप्पावर रागवलेला श्रेयस आता ‘या’ कारणामुळे करत नाही गणपतीचं विसर्जन यावेळी श्रेयस तळपदे म्हणाला कि, ‘‘कंगनाचा मला फोन आला तेव्हा तिने मला जॉर्ज फर्नांडिस यांच्या भूमिकेसाठी विचारलं होतं पण मी जेव्हा तिला भेटायला गेलो तेव्हा तिने मला ‘तू अटलजींची भूमिका करावीस’ अशी इच्छा बोलून दाखवली. पण मी त्यासाठी लगेच तयार नव्हतो. कारण पडद्यावर अटलजींची भूमिका साकारणं हे आव्हान होतं.’’
पुढे श्रेयस म्हणाला, ‘‘पण मी ते आव्हान स्वीकारण्याचं ठरवलं. कारण माझ्यातील अभिनेत्याचा कस लावणारी ती भूमिका होती. पण मला हि भूमिका साकारताना कंगनाने, अनुपम खेर यांनी खूप मदत केली. त्याच्यामुळे मी हे आव्हान पेलवू शकलो.’’ अशा भावना श्रेयसने व्यक्त केल्या आहेत. तसेच श्रेयसने यावेळी ‘‘मी स्वतःला भाग्यवान समजतो कि मला इतक्या मोठ्या, दूरदृष्टी असणाऱ्या, भारतरत्न अटल बिहारी वाजपेयींची भूमिका जगण्याची संधी मिळाली.’’ अशा भावना श्रेयसने व्यक्त केल्या आहेत. तसेच त्याने कंगना रणौतचे देखील आभार मानले आहेत. अभिनेता श्रेयस तळपदेचा नावीन्यपूर्ण भूमिका करण्याकडे कल असतो. सध्या तो चित्रपट, टेलिव्हिजन सगळी माध्यमे गाजवत आहे. नुकतीच त्याची ‘कौन प्रवीण तांबे’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्याला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. तर झी मराठीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मधील यशसुद्धा प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. तर त्याच्या ‘पुष्पा’ चित्रपटाच्या हिंदी डायलॉगने तर सगळीकडे धुमाकूळ घातला होता. आता त्याला या नवीन भूमिकेत पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.