मुंबई, 19 फेब्रुवारी- आज राज्यभर छत्रपती शिवाजी महाराजांची 393 वी जयंती साजरी केली जात आहे. आज प्रत्येक व्यक्ती शिवरायांच्या भक्तीत रमलेली दिसून येत आहे. सर्वजण मोठ्या भक्तिभावाने आपल्या लाडक्या राजाला वंदन करत आहेत. दरम्यान अनेक मराठमोळे कलाकारसुद्धा शिवरायांना सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिवादन करताना दिसून येत आहेत. ‘बिग बॉस मराठी’ फेम अभिनेते किरण मानें नीसुद्धा शिवरायांच्या जयंतीनिमित्त खास पोस्ट शेअर करत राजेंबद्दल असलेलं आपलं प्रेम, आदर आणि भक्ती व्यक्त केली आहे. बिग बॉस मराठीच्या माध्यमातून मराठी अभिनेते किरण माने घराघरात पोहोचले आहेत. यशोमध्ये त्यांनी टॉप 3 मध्ये मजल मारली होती. थोडक्यात त्यांना ट्रॉफीला हुकावं लागलं होतं. परंतु तरीही त्यांचा प्रचंड मोठा चाहतावर्ग निर्माण झाला आहे. चाहते सतत त्यांच्याबाबत जाणून घेण्यासाठी उत्सुक असतात. किरण मानेसुद्धा सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असतात. आजछत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त त्यांनी खास पोस्ट शेअर करत सर्वांचं लक्ष वेधलं आहे. (हे वाचा: Subodh Bhave: सुबोध भावेच्या डोक्यावर सजणार ‘या’ ऐतिहासिक पात्राचा ‘ताज’; फर्स्ट लूक आला समोर ) किरण माने इन्स्टाग्राम पोस्ट- ..शिवराय कशाच्या सहाय्यानं लढले? शारीरिक बळाच्या? तलवारीच्या? की कुणा सहकार्याच्या सल्ल्याच्या? नाय नाय नाय माझ्या दोस्तांनो… शिवरायांची ताकद एकच होती… त्यांची ‘अनल्प’ बुद्धी ! ‘अनल्प’ म्हणजे अफाट, अमर्याद. इंग्लीशमध्ये सांगायचं तर इन्फिनाईट इन्टेलिजन्स. शिवरायांच्या विलक्षण बुद्धीमत्तेचं वर्णन करताना परमानंदानं हा शब्द वापरलाय. परमानंद… एक अत्यंत प्रतिभावान शिवकालीन कवी ! होय, तोच तो ज्यानं शिवरायांच्या हयातीत, शिवरायांच्या परवानगीनं त्यांचं चरीत्र लिहीलं !! …परमानंदाबद्दल मी सगळ्यात पहिल्यांदा वाचलं डाॅ. आ.ह. साळुंखेंच्या ‘शिवराय : संस्कार आणि शिक्षण’ या पुस्तकात. “शिवरायांसाठी परमानंदाने वापरलेला ‘अनल्पधी:’ हा शब्द माझ्या काळजाला स्पर्श करुन गेला आहे आणि मस्तकामध्ये कोरला गेला आहे.” असं आ.ह. तात्या म्हणातात. यावरूनच याचं मोल काय असेल ते आपण ओळखू शकतो.
…शिवरायांनी अफजलखानाचा कोथळा कसा बाहेर काढला, आग्र्याहून कशी शिताफीनं सुटका करून घेतली, शाहिस्तेखानावर कसा छुपा हल्ला केला. या सुरस कथा आपण कायम ऐकतो… पण हे सगळं त्यांनी फक्त ताकदीवर, किंवा शस्त्रास्त्रांच्या मदतीनं केलं नाही… प्रत्येक लढाई शिवराय ‘बुद्धीनं’ लढले. शक्तीचा आणि शस्त्रांचा वापर करण्याआधी, त्यांच्या प्रत्येक चालीवर बुद्धीचा लगाम होता. खर्या अर्थानं ‘मास्टरमाईंड’ !
माझ्या भावांनो आणि बहिणींनो, आपल्या सगळ्या कर्तबगारीचा उगम मेंदूतूनच होतो. आपण कुठल्याही क्षेत्रात कार्यरत असूद्यात…तिथे आपण जे काही ‘ॲचिव्ह’ करतो, कमावतो, पराक्रम गाजवतो, त्या सगळ्याचं मूळ असते ‘बुद्धी’. आपलं बोलणं, आपल्या हालचाली, आपली ताकद, आपण व्यक्त होण्यासाठी जे जे काही वापरतो… मन असो वा मनगट, पेन असो वा पिस्तूल… कशालाही ताकद देण्याचं, योग्य दिशा दाखवण्याचं, भान आणि नियंत्रण ठेवण्याचं काम कोण करत असेल तर ‘बुद्धी’ !..आपल्याला जर शिवरायांच्या महान कार्याचा अभिमान बाळगायचाय, तर त्यांच्या बाकीच्या सगळ्या गोष्टींबरोबरच या ‘अनल्प बुद्धी’चा वारसा घेणं आजच्या काळात लै लै लै गरजेचं आहे. विवेकाच्या शत्रूचा सामना करताना, जर बुद्धीनं लढायचं तंत्र आपण शिकलो, तर सच्च्या शिवभक्ताला कुठलीबी लढाई अवघड नाही !!! जय शिवराय. - किरण माने.