मुंबई 12 ऑक्टोबर : सर्वांची आवडती अभिनेत्री दिशा वकानी म्हणजेच दयाबेन हिला कॅन्सर झाल्याची अफवा इतकी व्हायरल झाली की ती सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली. मात्र या सर्व केवळ अफवा आहेत. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये दिशा वाकाणीचे सहकलाकार आणि मालिकेत जेठालालची भूमिका साकारणारे दिलीप जोशी यांनी ही अफवा असल्याचे म्हटले आहे. आज तकला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले कि, “मला सतत लोकांचे फोन येत आहेत. ही हास्यास्पद बातमी आहे. मला असे वाटत नाही की त्याचा प्रचार करण्याची गरज आहे. मी एवढेच म्हणेन की ही एक अफवा आहे. यावर लक्षदेण्याची काही गरज नाही.” यानंतर आता ‘तारक मेहता…’ मालिकेचे निर्माते असित मोदी यांनीही या विषयावर प्रतिक्रिया देत आपले मत व्यक्त केले आहे. मालिकेत दयाबेनच्या एका विशिष्ट आवाजात बोलल्याने दिशाला कॅन्सर झाला अशी माहिती समोर आली होती. पण यावर स्पष्टीकरण देत निर्मात्यांनी या बातमीची खिल्ली उडवली. ते म्हणाले कि, ‘‘कॅन्सर तंबाखू खाल्ल्याने होतो, कुठला आवाज काढल्याने नाही. असे असते तर कोणी मिमिक्री केलीच नसती.’’ या बाबतीत असित मोदी यांनी योग्य मत नोंदवले असे चाहत्यांचे मत आहे. कारण जर अशी मिमिक्री करून किंवा वेगळा आवाज काढून घशाचा कॅन्सर झाला असता, तर जगातील करोडो मिमिक्री आर्टिस्टचे काय होणार? असे मत चाहते आता नोंदवत आहेत. हेही वाचा - Fact check : तारक मेहतामधील दयाबेनला घशाचा कॅन्सर? भावाच्या वक्तव्यानंतर सत्य उघड दिशाबद्दल बोलायचे झाले तर ती 2008 पासून ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये काम करत होती. तिने सप्टेंबर 2017 मध्ये म्रटर्नीटी लिव्ह घेतली आणि त्यानंतर ती 5 महिन्यांनंतर शोमध्ये परतणार असल्याचे बोलले जात होते. तेव्हापासून तिचे चाहते ती शोमध्ये परतण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. शोमध्ये परतण्यासाठी निर्मात्यांनी अनेकदा तिच्याशी संपर्क साधला पण तिने नकार दिला. दिशा शोची सर्वात लोकप्रिय आणि आवडती अभिनेत्री होती.
दिशा वाकाणीने अनेकदा दयाबेनच्या विचित्र आवाजाबद्दल तिचं मत मांडलं होतं. एका मुलाखतीत दिशाने सांगितले होते की, ‘प्रत्येक वेळी तोच आवाज कायम ठेवणे खूप कठीण होते. पण देवाच्या कृपेने कधीही त्यांच्या आवाजाला इजा झाली नाही किंवा घशाची कोणतीही समस्या निर्माण झाली नाही.’’ या आवाजाने ती दिवसाचे 11-12 तास सतत शूटिंग करत असे.’