मुंबई, 17 जून : बहुचर्चित चित्रपट आदिपुरुष काल रिलीज झाला. चित्रपटाला प्रेक्षकांचा नकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाचा दिग्दर्शक ओम राऊतला सध्या सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करण्यात येत आहे. आदिपुरुष चित्रपट पाहून प्रेक्षक आता रामानंद सागर यांनी बनवलेल्या रामायण मालिकेचं कौतुक करत आहेत. ३६ वर्षांपूर्वी आलेली ही मालिका आदिपुरुषच्या तुलनेत खूप वरचढ आहे असं प्रेक्षकांचं म्हणणं आहे. आता आदिपुरुष या चित्रपटावर रामानंद सागर यांचा मुलगा प्रेम सागर यांची प्रतिक्रिया समोर येत आहे. रामानंद सागर यांचा मुलगा प्रेम सागर यांनी दिग्दर्शक ओम राऊत यांनी ‘आदिपुरुष’मध्ये प्राचीन भारतीय महाकाव्य रामायणाचा चुकीचा अर्थ लावल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. एका नवीन मुलाखतीत प्रेम सागरने सांगितले की, ‘मी चित्रपट पाहिला नाही, पण टीझर आणि ट्रेलर पाहिला आहे. यावर प्रतिक्रिया देताना प्रेम सागर म्हणाले की, ‘माझे वडील रामानंद सागर यांनीही ‘रामायण’ बनवताना स्वातंत्र्याचा वापर केला, परंतु त्यांना भगवान राम समजले होते. अनेक ग्रंथ वाचून त्यांनी त्यात किरकोळ बदल केले पण वस्तुस्थितीशी छेडछाड करण्याचा प्रयत्न कधी केला नाही.’
रावणाच्या रूपात सैफ अली खानच्या लूकवर प्रतिक्रिया व्यक्त करताना, प्रेम सागर म्हणाले की, ‘रावण हा खूप अभ्यासू आणि ज्ञानी व्यक्ती होता आणि त्याला खलनायक म्हणून चित्रित केले जाऊ शकत नाही. धर्मग्रंथानुसार, रावणाला माहित होते की केवळ भगवान रामाच्या हातूनच मोक्ष मिळू शकतो. म्हणून त्याने इतका विनाश केला. श्रीरामही रावणाला विद्वान मानायचे. जेव्हा रावणाचा मृत्यू होणार होता, तेव्हा श्रीरामांनी काहीतरी शिकवण मिळेल या उद्देशाने लक्ष्मणाला त्याच्या चरणाकडे जाण्यास सांगितले होते. त्यामुळेच तुम्ही रावणाला खलनायक म्हणून दाखवू शकत नाही.’ शाहरुखपेक्षा प्रभास ठरला ‘बाहुबली’; पाहा Adipurushचं पहिल्या दिवसाचं Box Office Collection ते म्हणाले, ‘सर्जनशील स्वातंत्र्याच्या नावाखाली तुम्ही रावणाला भयंकर खलनायक म्हणून सादर करू शकत नाही. आजचे रामायण तुम्ही बनवले असेल तर ब्रीच कँडी आणि कुलाबा येथे दाखवा, जगभर दाखवू नका आणि लोकांच्या भावना दुखावू नका.’ ‘तेल तेरे बाप का, जलेगी तेरे बाप की’ या हनुमानाच्या तोंडी असलेल्या डायलॉगबद्दलही त्यांना मुलाखतीत विचारण्यात आलं. यावर उत्तर देताना प्रेम सागर हसले आणि याचा टपोरी स्टाइल असा उल्लेख केला. ओम राऊतने ‘आदिपुरुष’ चित्रपट मार्वेल बनवण्याचा प्रयत्न केला, अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. ते म्हणाले की, कृतिवासी आणि एकनाथ यांच्यासह अनेकांनी रामायण लिहिले पण कोणीही त्याचा आशय बदलला नाही. फक्त रंग आणि भाषा बदलली होती. पण आदिपुरुषमध्ये सर्व वस्तुस्थिती बदलली आहे. रामायणावर वेब सिरीज किंवा चित्रपट बनवण्याचा विचार करत आहात का, असे विचारले असता प्रेम सागर म्हणाले, ‘पापाजी म्हणाले होते, असे रामायण 85 वर्षे कोणीही बनवू शकणार नाही.’ आणि आता माझ्या वडिलांनी ते बनवून ठेवलं आहे. अशी प्रतिक्रिया प्रेम सागर यांनी व्यक्त केली.