मुंबई,4 जानेवारी- शिक्षण पूर्ण झाल्यावर नोकरीच्या मागं न लागता, स्वतःचा उद्योग सुरू करण्याकडे तरुणाईचा कल वाढला आहे. यामुळे रोजगार संधी उपलब्ध होत आहेत. सरकार अशा स्टार्टअप्सला सर्वतोपरी प्रोत्साहनदेखील देत आहे. गेल्या काही वर्षात अनेक स्टार्टअप नावारुपाला आली आहेत. पण सध्या दोन स्टार्टअप खास कारणामुळे चर्चेत आहेत. ही स्टार्टअप महाराष्ट्रातील जुळ्या लहान भावांनी सुरू केली आहेत. यापैकी एक स्टार्टअप ना नफा ना तोटा तत्त्वावर सुरू आहे तर दुसरं स्टार्टअप तंत्रज्ञानाशी संबंधित आहे. लहानवयात या भावंडांनी स्टार्टअपमध्ये घेतलेली भरारी नक्कीच कौतुकास्पद आहे. या दोन्ही स्टार्टअपविषयी सविस्तर जाणून घेऊया. `टाइम्स ऑफ इंडिया`ने याबाबतची माहिती दिली आहे.
अनय रामकृष्णन आणि अबीर रामकृष्णन हे नव्या युगातील उद्योगक्षेत्रातील सर्वात तरुण उद्योजकांपैकी एक म्हणावे लागतील. अनय आणि त्याचा जुळा भाऊ अबीर या दोघांच्या नावावर दोन स्टार्टअप्स आहेत. अनय अबीरची ओळख कंपनीचा सह-संस्थापक अशी करून देतो. ``यापैकी एक स्टार्टअप उदयोन्मुख स्थितीत आहे आणि दुसऱ्याचा विचार सुरू आहे,`` असं आठ वर्षाचा अनय सांगतो. ``आमच्या स्टार्टअप्सपैकी एक स्टार्टअप ना नफा ना तोटा तत्त्वावरची कंपनी आहे, तर दुसरं सखोल तंत्रज्ञानावर आधारित स्टार्टअप आहे,`` असं अनयने सांगितलं. गेल्या दोन महिन्यांत त्यांच्या एका कंपनीला पाच लाख रुपयांचा निधी मिळाला आहे. या भावंडाचा नफा अपेक्षित नसलेलं स्टार्टअप वंचित मुलांसाठी काम करतं.
(हे वाचा:Success Story : नोकरी करत केला 6 महिन्यांचा कोर्स, आता करतात लाखोंची कमाई! Video )
या स्टार्टअपच्या माध्यमातून डोनर अर्थात दात्यांकडून कपडे, खेळणी आणि पुस्तकं जमा केली जातात आणि ती वंचित मुलांपर्यंत पोहोचवली जातात. त्यांच्या या चॅरिटीमुळे कार्बन फूटप्रिंट कमी होण्यास मदत होते. ``कपड्यांसारख्या वस्तू काही काळ वापरल्यानंतर टाकून दिल्या जातात. परंतु,आता चॅरिटीमुळे त्याचा पुनर्वापर शक्य झाला आहे,`` असं अबीर सांगतो. या वेळी यापैकी एकाने कार्बन फूटप्रिंट कॅल्क्युलेटरच्या आधारे ही समस्या कमी करण्यासाठी खेळणी, काही कपडे किंवा पुस्तकं पुन्हा वापरणं किती गरजेचं आहे, हे दाखवलं. sharingmitra.org या चॅरिटी स्टार्टअपच्या माध्यामातून आतापर्यंत 2.40 लाख किलो कार्बन फूटप्रिंट नष्ट झाल्याचं अबीरनं सांगितलं.
``गेल्या उन्हाळ्याच्या सुट्टीत आम्ही अमरावतीतील एका कॅम्पमध्ये गेलो होतो. तिथं आम्हाला गरीब मुलांशी संवाद साधण्याची संधी मिळाली. यावेळी या मुलांची स्थिती पाहून आम्हाला धक्का बसला. अमरावतीहून परतल्यावर आम्ही इंटरनेटवर खूप संशोधन केलं. त्यात युनिसेफच्या आकडेवारीनुसार, भारतात 10 कोटी तर जगभरात 150 कोटी मुलं गरजू आणि गरीब असल्याचं धक्कादायक वास्तव आम्हाला समजलं,`` असं अबीर सांगतो.त्यानंतर या मुलांनी ओपन कोड प्लॅटफॉर्मच्या मदतीनं एक वेबसाईट तयार केली. एका मॉडेलनुसार त्यांनी डोनर्सकडून वस्तू घेऊन त्या वंचित मुलांपर्यंत पोहचवण्यास सुरूवात केली. त्यात कपडे आणि खेळणी यांचे प्रमाण जास्त होते. ``या गोष्टी अशा आहे की ज्या डोनर्सकडून टाकून दिल्या जाऊ शकतात. त्यानंतर आम्हाला महानगरपालिकेच्या शाळांकडून लक्ष्यांक मिळाला,`` असं अबीरने सांगितलं.
(हे वाचा: Nashik : 'चायवाला नरेंद्र' बनला इन्कम टॅक्स ऑफिसर! पाहा Success Video)
``आम्हाला मिळालेला फंड हा डिलिव्हरी पार्टनरसाठी वापरला जाणार आहे. तसेच दान केलेल्या वस्तू पोहोचवण्यासाठी झोमॅटो किंवा स्विगीसारख्या कंपन्यांना यात सहभागी करून घेण्याचे आमचे नियोजन आहे. सध्या आमचं काम स्थानिक पातळीवर सुरू आहे. आमचे देणगीदार आणि स्वीकारणाऱ्या व्यक्ती दोघंही नागपूरपुरते मर्यादित आहेत, परंतु, आम्ही इतर शहरांमध्ये या उद्योगाचा विस्तार करण्याची योजना आखत आहोत,`` असं त्यांनी सांगितलं.
इमव्हर्स ही या जुळ्या भावंडांची दुसरी एक खासगी फर्म आहे. ``आर्टिफिशियल इंटिलिजन्सच्या मदतीनं लोकांचं जीवन सुसह्य करण्याचं आमचं ध्येय आहे,`` असं अनयने सांगितलं. ``तुमच्या डिव्हाइसमध्ये सहजपणे तयार करता येतील असे व्हर्च्युअल होलोग्राम तयार करण्याचं आमचं नियोजन आहे,`` असं त्यानं सांगितलं. यावेळी त्याने आयपॅडवर त्याचं मॉडेलही दाखवलं. ``हा होलोग्राम आर्टिफिशल इंटिलिजन्सच्या मदतीने बोलू शकतो, इंटरनेट सर्चिंग करू शकतो आणि आवाजाला प्रतिसाद देखील देऊ शकतो. या अॅपमुळे तुम्हाला महात्मा गांधी, अल्बर्ट आइन्स्टाइनसारखी व्यक्तिमत्त्व पुन्हा भेटू शकतात. तुम्हाला तुमच्या एखाद्या प्रियजनाला पुन्हा जिवंत करण्यासाठी या अॅपची प्रीमियम सर्व्हिस सब्स्क्राइब करावी लागेल,`` असं त्यानं सांगितलं.
``हे उत्पादन येत्या 15 महिन्यात तयार होईल अशी अपेक्षा आहे. यासाठी ते निधी मिळवण्याकरिता पाठपुरावा करीत आहेत. हा निधी कर्मचारी नियुक्तीसाठी वापरला जाईल, असं या भावंडांपैकी एकाने सांगितलं. कोविडमुळे आमच्या आजोबांचे (आईच्या वडीलांचे) निधन झाले. त्यानंतर आमच्या दुसऱ्या आजोबांचेही (वडीलांचे वडील) निधन झाले. त्यामुळे आम्ही एकटे पडलो. त्यांना या माध्यमातून व्हर्च्युअली परत आणू अशी आम्हाला आशा आहे, `` असं अनयने सांगितलं.अनय आणि अबीर हे उद्योजक होण्यापूर्वी एका वेगळ्याच गोष्टीमुळे चर्चेत आले होते. मोठ्या प्रमाणावर विविध पक्ष्यांच्या प्रजातींचा शोध लावल्याने या दोघांची आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद झाली आहे. ``मंगळावरील मूळ वसाहतीबाबत भरीव काम केल्याने या दोघांचे नाव गिनिज बुक्स ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंदलं गेलं आहे,`` अशी माहिती त्यांचे वडील आर रामकृष्णन यांनी दिली.
अनय आणि अबीर यांचे वडील आर.रामकृष्णन हे इन्व्हेस्टमेंट बँकर आहेत. त्यांची आई प्रीती रामकृष्णन या आयटी प्रोफेशनल असून त्यांनी मॅनेजमेंट आणि कॉस्टिंग याविषयात पदवी मिळवलेली आहे. या जुळ्या भावंडांचे स्टार्टअप सध्या चर्चेचा विषय ठरले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Business News, Career, Job, Start business