मुंबई, 06 सप्टेंबर : सध्या रस्ते अपघातांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वीच NCRBने प्रसिद्ध केलेल्या एका अहवालानुसार, 2021 या वर्षात तब्बल 1.6 लाख भारतीयांनी आपला जीव रस्ते अपघातात गमावला होता. महाराष्ट्रातले मोठे नेते विनायक मेटे यांचंदेखील काही दिवसांपूर्वी अपघाती निधन झालं होतं. त्यानंतर 4 सप्टेंबर रोजी टाटा समूहाचे माजी चेअरमन सायरस मिस्त्री यांच्या गाडीला अपघात झाला. त्यामध्ये त्यांचं निधन झालं. सात एअरबॅग्ज असलेल्या सुरक्षित मर्सिडीजमध्ये असूनही केवळ सीटबेल्ट न लावल्यामुळे मिस्त्री यांचा मृत्यू झाला, असं समोर आलं आहे. यामुळेच आता केंद्र सरकार गाडीमधल्या सीटबेल्टशी संबंधित नियमांमध्ये बदल करण्याच्या विचारात आहे. ‘झी न्यूज’ने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. सीटबेल्ट क्लिपसंबंधी नियमात बदल हिंदुस्तान टाइम्सने परिवाहन मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या हवाल्याने एक रिपोर्ट प्रसिद्ध केला आहे. त्यामध्ये सीटबेल्टसंबंधी कोणते निर्णय बदलले जाऊ शकतात याबाबत माहिती दिली आहे. यानुसार, कारमध्ये सीटबेल्ट बीप अलार्म बंद करणारे स्टॉपर्स लावण्यावर बंदी लागू करण्यात येईल. “सर्व प्रकारच्या सीट बेल्ट क्लिपवर बंदी आणण्याचा आदेश आम्ही लवकरच लागू करणार आहोत, यासाठी प्रक्रिया सुरू आहे,” असं या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं. हेही वाचा - Cyrus Mistry : दिवंगत उद्योजक सायरस मिस्त्रींचे आजोबा होते चित्रपटांचे शौकीन, ‘मुघल-ए-आझम’साठी खर्च केले होते कोटी रुपये भारतात विकल्या जाणाऱ्या बहुतांश गाड्यांमध्ये पुढच्या सीटवर बसलेल्या व्यक्तींनी सीटबेल्ट न लावल्यास वॉर्निंग देण्याची सुविधा आहे. कित्येक जण ही वॉर्निंग बंद करण्यासाठी सीटबेल्ट क्लिप लावतात. त्यामुळे सीटबेल्ट न लावताही विनाव्यत्यय गाडी चालवता येते. देशातल्या काही गाड्यांमध्ये तर अशी सोय आहे, की सीटबेल्ट लावला नसल्यास त्या पुढेच जात नाहीत; मात्र मागे बसणाऱ्या व्यक्तींनी सीटबेल्ट न लावल्यास अशा प्रकारचा कोणताही अलार्म किंवा वॉर्निंग देणारी सिस्टीम उपलब्ध नाही. यामुळेच याबद्दलच्या नियमात बदल करण्यात येणार आहे. सोबतच ‘हे’ नियमही लागू होणार सीटबेल्टसंबंधी नियमांसोबतच कारमध्ये सहा एअरबॅग्ज; मधल्या आणि मागच्या सीटसाठी थ्री-पॉइंट सीट बेल्ट अनिवार्य करणं आणि सीटबेल्टच्या महत्त्वाबाबत जागरूकता वाढवणं या गोष्टींची घोषणाही केली जाऊ शकते. या सर्व नियमांची घोषणा आणि अंमलबजावणी झाल्यास रस्त्यांवर होणाऱ्या अपघाती मृत्यूंचं प्रमाण कमी होण्यास मदत मिळणार आहे. तसंच, देशातली चारचाकी वाहनं सुरक्षित होण्यासाठीही हे नियम फायद्याचे ठरतील.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.