टीम इंडिया
हॅमिल्टन, 26 नोव्हेंबर: भारत आणि न्यूझीलंड संघातला दुसरा वन डे सामना आज हॅमिल्टनच्या सेडॉन पार्क स्टेडियमवर सुरु झाला. या सामन्याआधी न्यूझीलंडनं टॉस जिंकून टीम इंडियाला बॅटिंगचं आमंत्रण दिलं. पण टॉसवेळी भारतीय कर्णधार शिखर धवननं संघात केलेले बदल सांगितले त्यावेळी अनेकांना आश्चर्य वाटलं. कारण आजच्या सामन्यासाठी धवननं टीम इंडियात दोन बदल केले आहेत. शार्दूल ठाकूरऐवजी त्यानं दीपक चहरला संधी दिली. तर दीपक हुडाला टीममध्ये घेताना गेल्या सामन्यात 36 धावांची खेळी करणाऱ्या संजू सॅमसनला मात्र त्यानं संघाबाहेर बसवलं. त्यामुळे चाहत्यांमधून रोष व्यक्त केला जात आहे. संजूच का, पंत का नाही? ऑकलंडच्या पहिल्या वन डेत रिषभ पंतनं अवघ्या 15 धावा केल्या होत्या. पण त्याचवेळी संजू सॅमसननं 38 बॉलमध्ये 36 धावांची खेळी केली होती. टी20 क्रिकेटमध्येही पंतच्या खराब प्रदर्शनानंतरही त्याला वारंवार संधी दिली जाते. पण तेच संजू सॅमसनच्या बाबतीत घडताना दिसत नाही. म्हणूनच केवळ एक मॅच खेळवून त्याला वन डे मालिकेतही ड्रेसिंग रुममध्येच बसावं लागत असल्यानं चाहत्यांनी टीम सिलेक्शनवरुन बीसीसीआयला सवाल केले आहेत. इतकच नव्हे तर सोशल मीडियात संजू सॅमसनचा हॅशटॅग चांगलाच ट्रेंड होत आहे.
हेही वाचा - FIFA WC 2022: रोनाल्डोच्या आयुष्याचे 5 नियम… म्हणून दारु, सिगरेट आणि टॅटूपासून दूर आहे हा स्टार फुटबॉलर! पावसाचा व्यत्यय दरम्यान हॅमिल्टनच्या दुसऱ्या वन डेत पावसानं व्यत्यय आणला. अवघ्या 4.5 ओव्हर्सचा खेळ झाल्यानंतर पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे खेळ थांबवण्यात आला. तेव्हा भारतीय संघानं बिनबाद 22 धावा केल्या होत्या.