जेमिमा रॉड्रिग्स आणखी एक अर्धशतक
सिल्हेत-बांगलादेश, 4 ऑक्टोबर: महिलांच्या आशिया कपमध्ये सातव्या विजेतेपदाच्या निर्धारानं मैदानात उतरलेल्या टीम इंडियानं विजयी धडाका कायम ठेवला. जेमिमा रॉड्रिग्स आणि दिप्ती शर्माच्या शतकी भागीदारीच्या जोरावर आज भारतानं यूएईचा धुव्वा उडवला. भारताचा या स्पर्धेतला सलग तिसरा विजय ठरला. या विजयासह पॉईंट टेबलमध्ये भारतीय संघ अव्वल स्थानावर पोहोचला आहे. या सामन्यात भारतानं दिलेल्या 179 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना यूएईला 4 बाद 74 धावांचीच मजल मारता आली. त्यामुळे भारतानं हा सामना तब्बल 104 धावांनी जिंकला. जेमिमा पुन्हा चमकली भारताची आघाडीची फलंदाज जेमिमा रॉड्रिग्सनं या स्पर्धेतलं सलग दुसरं अर्धशतक झळकावलं. तिनं 3 बाद 19 वरुन भारताला 5 बाद 178 धावांची मजल मारुन दिली. जेमिमानं दिप्ती शर्मासह तिसऱ्या विकेटसाठी 129 धावांची भागीदारी केली. दिप्ती 49 बॉलमध्ये 64 धावा केल्या. तर मुंबईकर जेमिमानं 45 बॉलमध्ये 11 फोरसह नाबाद 75 धावा फटकावल्या. याआधी श्रीलंकेविरुद्धही तिनं 76 धावा फटकावल्या होत्या. तर मलेशियाविरुद्धच्या सामन्यात तिला फलंदाजीची संधी मिळाली नाही. तीनपैकी दोन सामन्यात खेळताना जेमिमानं आतापर्यंत या स्पर्धेत 139 च्या स्ट्राईक रेटनं 143 धावा केल्या आहेत. हेही वाचा - Rishabh Pant Birthday: रिषभ पंतला गर्लफ्रेंड ईशा नेगीनं रोमँटिक अंदाजात केलं बर्थडे विश, म्हणाली… हरमनप्रीतनं घेतली विश्रांती यूएईविरुद्ध टीम इंडियाची नियमित कॅप्टन हरमनप्रीत कौरनं विश्रांती घेतली. हरमनप्रीतच्या अनुपस्थितीत स्मृती मानधनानं संघाचं नेतृत्व केलं. दरम्यान याही सामन्यात भारतानं अनेक बदल करुन पाहिले. विकेट किपर बॅट्समन रिचा घोषला आजच्या सामन्यात सलामीला बढती देण्यात आली. पण तीन पहिल्याच बॉलवर बाद झाली. त्यानंतर गेल्या सामन्यातली मॅन ऑफ द मॅच मेघनाही लवकर माघारी परतली. चौथ्या नंबरवर फलंदाजीला आलेल्या हेमलतालाही मोठी खेळी करता आली नाही. तिसऱ्या विकेटच्या रुपात ती 2 धावा काढून बाद झाली. पण त्यानंतर जेमिमा आणि दिप्ती शर्मानं टीम इंडियाच्या डावाला आकार दिला.
आता आव्हान पाकिस्तानचं 7 ऑक्टोबरला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचं भारतासमोर आव्हान असणार आहे. दुपारी 1 वाजता हा सामना सुरु होईल. पाकिस्ताननंही या स्पर्धेत आपले पहिले दोन्ही सामने जिंकले आहेत. त्यामुळे शुक्रवारी होणारा सामना चुरशीचा होण्याची शक्यता आहे.