मुंबई, 10 नोव्हेंबर : ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेची फायनल मॅच येत्या रविवारी (13 नोव्हेंबर 2022) होणार आहे. बुधवारी (9 नोव्हेंबर 2022) पाकिस्तानच्या टीमनं न्यूझीलंडचा पराभव करून फायनलमध्ये धडक मारली आहे. त्यामुळे आता भारतीय क्रिकेट टीमनं फायनलमध्ये धडक मारली, तर पुन्हा एकदा क्रिकेटप्रेमींना महामुकाबला पाहण्यास मिळू शकतो. मात्र, भारतीय टीमला फायनलमध्ये जाण्यासाठी सेमी फायनलमध्ये इंग्लंडच्या टीमचा पराभव करावा लागणार आहे. त्यासाठी टीम इंडियाचा गेम प्लॅन तयार आहे. भारतीय टीमचा कॅप्टन रोहित शर्मा यानं स्वतः हा गेम प्लॅन सांगितला आहे. ‘एबीपी लाइव्ह’ने याबाबत वृत्त दिलंय. भारत आणि इंग्लंड यांच्यातील ही मॅच अॅडलेड ओव्हलमध्ये होईल. भारतीय वेळेनुसार दुपारी 1.30 वाजता ही मॅच सुरू होईल. या मॅचमधील विजयी टीम फायनल मॅचसाठी येत्या रविवारी पाकिस्तानविरुद्ध मैदानात उतरेल. गेम प्लॅन तयार! ‘इंग्लंडविरुद्धच्या सेमीफायनल अगोदर आमची टीम आत्मविश्वासानं भरलेली आहे. आमच्या खेळाडूंमध्ये आत्मविश्वासाची कमतरता नाही. पण इंग्लंडसारख्या टीमविरुद्ध मैदानावर आम्हाला 100 टक्के योगदान द्यावं लागेल, यात शंका नाही. मला खात्री आहे की, आमची टीम हे करू शकेल. आम्ही इंग्लंडविरुद्ध सेमीफायनल मॅच जिंकण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू,’ असं टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मानं जाहीर केलंय. इंग्लंडविरुद्ध मॅच जिंकण्यासाठी रोहितनं टॉस हरणं गरजेचं? पाहा काय आहे नेमकं प्रकरण ‘टी-20 क्रिकेट कसं खेळलं जातं, हे आम्हाला माहीत आहे. या फॉरमॅटमध्ये तुम्ही मॅचच्या दिवशी कसे खेळता, हे खूप महत्त्वाचं आहे. या फॉरमॅटमध्ये मॅच जिंकण्यासाठी तुम्हाला चांगलं क्रिकेट खेळावं लागेल. आम्ही तसे करण्यात अयशस्वी झाल्यास, निकाल आमच्या विरोधात जाऊ शकतो,’ असेही रोहित शर्मा याने स्पष्ट केलं. दरम्यान, भारत-इंग्लंड यांच्यातील होणाऱ्या सेमी फायनलमध्ये भारतीय टीम जिंकल्यास पुन्हा एकदा टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत भारत-पाकिस्तान यांच्यातील महामुकाबला पाहण्यास मिळणार आहे. 2007 च्या टी-20 वर्ल्ड कप क्रिकेट स्पर्धेत फायनल मॅच भारत विरुद्ध पाकिस्तान अशी झाली होती. त्यावेळी पाकिस्तानचा पराभव करत आता पुन्हा एकदा भारतीय टीमला क्रिकेट वर्ल्ड कप जिकण्याची संधी आली आहे.