अक्षर पटेल आणि साबा करीम
मुंबई, 6 सप्टेंबर**:** आशिया चषकात ऐन मोक्याच्या क्षणी टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जाडेजाला दुखापत झाली. त्यामुळे भारतीय संघाचं संतुलन थोडफार बिघडलं. पाकिस्तानविरुद्धच्या सुपर फोरच्या पहिल्या लढतीत जाडेजाची उणीव टीम इंडियाला प्रकर्षानं जाणवली. जाडेजाच्या गुडघ्याला दुखापत झाली त्यामुळे आशिया चषकात स्टँड बाय ठेवलेल्या अक्षर पटेलला संघात स्थान मिळालं. पण जाडेजाच्या जागी अक्षर पटेल ही निवड योग्य नसल्याचं बीसीसीआयच्या माजी निवड समिती सदस्य राहिलेल्या साबा करीम यांनी म्हटलं आहे. भारतीय संघात एका अनुभवी वेगवान गोलंदाजाची कमी आहे. त्यामुळे जाडेजाच्या जागी एक वेगवान गोलंदाज खेळवायला हवा होता असं साबा करीम यांचं मत आहे. दीपक चहर होता योग्य पर्याय सध्या भारतीय संघात वेगवान गोलंदाजीची धुरा अनुभवी भुवनेश्वर कुमारसह अर्शदीप सिंग आणि आवेश खान यांच्याकडे आहे. पण अर्शदीप आणि आवेशकडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा मोठा अनुभव नाही. त्यामुळे दीपक चहर संघात हवा होता असं साबा करीम यांना वाटतं. चहरकडे चेंडू स्विंग करण्याची कला आहे त्याचबरोबर तो लवकर विकेट काढून देऊ शकतो. टी20 फॉरमॅटमधला तो एक स्पेशालिस्ट गोलंदाज आहे. याशिवाय आधीच संघात आधीच रवी बिश्नोई, युजवेंद्र चहल, रवीचंद्रन अश्विन असे तीन फिरकी गोलंदाज असताना आणखी स्पिनर कशाला, त्याऐवजी चहरचा समावेश का केला नाही असा सवालही करीम यांनी केला. हेही वाचा - Suresh Raina : ‘मिस्टर आयपीएल’ सुरेश रैनाची सर्व प्रकारातून निवृत्ती, 2 दशकांची कारकिर्द समाप्त
श्रीलंकेविरुद्ध निर्णायक लढत
दरम्यान आज दुबईत भारतीय संघ श्रीलंकेविरुद्ध निर्णायक लढत खेळणार आहे. पाकिस्तानविरुद्धच्या पराभवामुळे तर दुसरीकडे श्रीलंकेनं अफगाणिस्तानला हरवल्यानं टीम इंडियासाठी आजचा मुकाबला ‘करो या मरोचा’ असणार आहे. त्यामुळे भारतीय संघव्यवस्थापन या सामन्यात प्लेईंग इलेव्हन कशी निवडते हे पाहणं महत्वाचं ठरेल.