(राम मंदिर, अयोध्या)
सर्वेश श्रीवास्तव, प्रतिनिधी अयोध्या, 1 जून : देश-विदेशातील करोडो रामभक्त अयोध्येतील राममंदिरात रामलल्लाचे दर्शन घेण्यासाठी आतुर आहेत. भाविकांच्या भावना लक्षात घेऊन श्री राम मंदिर उभारणीचं काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. कोणत्याही नैसर्गिक आपत्तीने मंदिराचं तसूभरही नुकसान होऊ नये, असं भक्कम बांधकाम केलं जातंय. याचाच एक भाग म्हणून मंदिराच्या छतावरील प्रत्येक दगडाला तांब्याच्या पट्टीने दुसऱ्या दगडाशी जोडलं जात आहे. वैज्ञानिक तंत्रज्ञानाच्या आधारे हे बांधकाम सुरू आहे. श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी याबद्दल सांगितलं की, ‘राम मंदिराच्या छतावरील दोन दगडांना जोडण्यासाठी तांब्याचा वापर केला जातोय. तांब्याचं वय अनंत असतं. (Marriage : लग्न अडलंय तर या मंदिरात करा बोलणी; संसार सुरू झालाच म्हणून समजा!) 100 वर्षात लोखंड गंजून खराब होतं पण तांबे 1000 वर्षे जसच्या तसं राहतं. त्यामुळे येथे तांब्याचा वापर करण्यात आला आहे. जेणे करून भूकंप झाला तरी एकही दगड आपल्या जागेवरून हलणार नाही.
दरम्यान, राममंदिराच्या तळमजल्याचं बांधकाम जुलैपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. तसंच गाभाऱ्यात रामलल्लाची मूर्ती बनवण्याचं काम सुरू करण्यात आलं असून सध्या छत बसवण्याचं काम जोमात चाललंय.