23 मार्च : पवारांनी आज अक्षरश: मतदारांना दोनदा मतदान करण्याचं आवाहन केलं. ‘आधी सातार्याला जाऊन मतदान करा, शाई पुसा नंतर मुंबईला येऊन पुन्हा मतदान करा,’ असं पवार म्हणाले. ते नवी मुंबईत माथाडी कामगारांच्या मेळाव्यात बोलत होते. पवारांसारखा अनुभवी आणि दिग्गज राजकारणी भर सभेत असे उद्गार काढतो, यावर आश्चर्य व्यक्त होतं आहे. या अशा वक्तव्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर पवार अडचणी येण्याची शक्यता आहे. पवारांच्या या दुहेरी (बोगस) मतदानाच्या सल्ल्यामुळे खळबळ माजली असून आता निवडणूक आयोग यावर काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, विरोधकांनी माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला असं शरद पवारांनी म्हटलंय. शरद पवारांची मोदींवर टीका ‘देशाचा इतिहास माहीत नसलेला माणूस पंतप्रधान कसा बनू शकतो’ असा प्रश्न विचारत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पन्हा एका नरेंद्र मोदींवर टीकास्त्र सोडले आहे. महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्तांना मदत करणार्यांवर मोदी सरकारने गुन्हे दाखल केले, असे सांगत अशा संकुचित मनोवृत्तीचा माणूस देश कसा चालवू शकेल, असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी पुन्हा एकदा मोदींवर हल्ला चढवला. दरम्यान, पवारांच्या या वादग्रस्त वक्तव्याचे आता पडसाद उमटायला लागले आहेत. या वक्तव्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचं भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी म्हटलं आहे. तर किरीट सोमैय्या यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांना पत्र लिहून पवारांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. आम आदमी पार्टीही या वक्तव्याविरोधात निवडणूक आयोगात जाणार आहे. मनसे नेते बाळा नांदगावकर यांनीही पवारांवर टीका केली आहे.