नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात वाहनांच्या चिंधड्या
महेश तिवारी, प्रतिनिधी दंतेवाडा, 27 एप्रिल : छत्तीसगडमघ्ये बुधवारी झालेल्या भीषण नक्षलवादी हल्ल्याची जबाबदारी नक्षलवाद्यांच्या दरभा विभागीय संघटनेचा सचिव साईनाथने स्वीकारली आहे. या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारत असल्याचं पत्र साईनाथने काढलं आहे. नक्षलवाद्यांच्या पीएलजीए म्हणजेच पीपल्स गुरील्ला आर्मीने हा हल्ला आपण केल्याचं मान्य केलं आहे. अरणपूरच्या हल्ल्याला सुरक्षा दलांकडून होत असलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर असल्याचं पत्रकात नमूद करण्यात आलं आहे. छत्तीसगडमध्ये झालेल्या या हल्ल्याचा घटनेदरम्यानचा व्हिडिओ समोर आला आहे. नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 11 जवान शहीद झाले होते. नक्षलवाद्यांनी घडवलेल्या स्फोटानंतर लगेच जवानांवर गोळीबारही केला गेला. मागून आलेल्या दुसऱ्या वाहनातील जवानांनी गोळीबाराला प्रत्युत्तर दिलं. या व्हिडिओमधून घटनास्थळावर गोळीबाराचा भीषण आवाजही ऐकू येत आहे.
नक्षलवाद्यांनी काही दिवसांपूर्वी एका पत्रात सुरक्षा दलांवर हल्ला करण्याची धमकी दिली होती. नक्षलवादी स्थानिक लोकांचे शोषण करत असून त्यांच्यासाठी समस्या निर्माण करत असल्याचा दावा त्यांनी केला. शोध मोहिमेत कोणतीही SOP पाळली गेली नाही अशीही प्राथमिक माहिती समोर आली आहे. जवळपास वर्षभराच्या शांततेनंतर जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी केलेल्या या IED स्फोटात 10 DRG जवान आणि एका नागरिकाचा मृत्यू झाला आहे. प्रोटोकॉलनुसार, ऑपरेशन दरम्यान इंटेलिजन्स इनपुट मिळाल्यानंतर आणि मार्गाची कसून तपासणी केल्यानंतरच सुरक्षा दल पुढे जाऊ शकतात. काहीवेळा सुरक्षा दल रोड ओपनिंग पार्टी (आरओपी) चीही मदत घेतात. रस्त्यावर कोणताही धोका नाही हे समजल्यावरच जवानांची गाडी पुढे जाते. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार डीआरजी वाहन आधीच माओवाद्यांच्या रडारवर असल्याचीही माहिती मिळाली आहे. ताफ्याच्या मार्गावर आणि हालचालींवर लक्ष ठेवले जात होते. जवानांनीही आपला मार्ग बदलला नाही, ही चूक टाळली असती तर अनर्थ टाळता आला असता असंही सांगितलं जात आहे. याआधी नक्षलवाद्यांनी स्थानिक नागरिकांना पत्र लिहून नेत्यांवर हल्ला करण्याची धमकी दिली होती. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार गुप्तहेरांनी रस्त्यावर कोणता धोका आहे की नाही याची माहिती घेतली नाही. नक्षलवाद्यांविरोधात कारवाई करण्यासाठी हे जवान मुख्यालयाकडे निघाले होते. मुख्यालयाकडे जात असतानाच अरणपूर इथे IED चा मोठा स्फोट झाला आणि जवानांचा मृत्यू झाला.