भोपाळ, 28 मार्च : बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. भारताला हिंदू राष्ट्र करण्याचं वक्तव्य केल्यानंतर आता धीरेंद्र शास्त्रींनी सांगितलं की, त्यांना मुस्लिम समुदायाने रामकथेसाठी आमंत्रित केलं आहे. हे आमंत्रण आपण स्वीकारले आहे. शास्त्री यांनी जबलपूरमध्ये रामकथा कार्यक्रमावेळी याची माहिती दिली. ते म्हणाले की, कटनीतील त्यांचे मुस्लिम भक्त तनवीर खान यांनी रामकथा ऐकण्याची इच्छा व्यक्त केली होती. धीरेंद्र शास्त्री म्हणाले की, मी ४-५ वर्षे जिवंत राहिलो तर इतर धर्माचे लोकही हरी हरी म्हणतील. आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत असलेले धीरेंद्र शास्त्री यांनी मुस्लिमांना रामकथा ऐकवण्याबाबत सांगताना म्हटलं की, इतिहासात पहिल्यांदाच असं होईल. आमचे प्रिय भक्त आणि शिष्य मुस्लिम समाजाचे तनवीर खान यांच्या कटनीत पूर्ण मुस्लिम समाज तीन दिवस आमची कथा आयोजित करणार आहे. त्यांना सर्वजण तानू म्हणतात. इथेही ते आले आहेत. तानू तिथले मुस्लिम समाजाचे अध्यक्ष आहेत. त्यांनी विनंती केली की, गुरुजी आमचीही इच्छा आहे की कथा व्हावी. त्यावर मी म्हटलं की, यात वाईट काय आहे. तुम्ही सर्व समाजाला बोलवा. सर्व टोपी वाल्यांना बोलवा, सर्वांना एकत्र येऊद्या. काय अडचण आहे रामकथा ऐकायला. बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री भाविकांना पदस्पर्श का करून देत नाहीत? `हे` आहे कारण जबलपूरमध्ये कथा सुरू असताना धीरेंद्र शास्त्रींच्या आणखी एका वक्तव्याची चर्चा होतेय. त्यांनी म्हटलं की, भारतात पूजेच्या नावावर, दरबाराच्या नावावर, मठांच्या आणि देवाच्या नावावर जो धंदा सुरू आहे तो करू देणार नाही. आम्हाला विश्वास आहे. तुम्ही चिंता करू नका. फक्त ४-५ वर्षांचा वेळ द्या, जिवंत राहिलो तर इतर धर्मातलेसुद्धा हरी हरी बोलतील. आम्ही वदवून घेऊ.