भोपाळ, 28 मार्च : गेल्या काही महिन्यांपासून मध्य प्रदेशातील छत्तरपूरमधील बागेश्वर धामचे पीठाधीश्वर धीरेंद्र कृष्ण शास्त्री जोरदार चर्चेत आहेत. धीरेंद्र शास्त्रींचे अनेक व्हिडिओ, त्यांच्या मुलाखती सोशल मीडियावर सातत्याने व्हायरल होत आहेत. धीरेंद्र शास्त्रींच्या दरबारात देशा-विदेशातील लोक हजेरी लावत आहेत. जीवनातील समस्या, अडचणी दूर व्हाव्यात यासाठी त्यांच्या दरबारात हजेरी लावणाऱ्या लोकांची संख्या वेगानं वाढत आहे. दरम्यान, धीरेंद्र शास्त्रींचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. यात त्यांनी आपण दर्शन घेताना भाविकांना पायास स्पर्श का करून देत नाही याचं कारण सांगितलं आहे. शास्त्री भाविकांना पायाला स्पर्श का करु देत नाहीत,हे सविस्तर जाणून घेऊ या.
बागेश्वर धामचे पीठाधीश्वर, राम कथा वाचक धीरेंद्र शास्त्री सध्या जोरदार चर्चेत आहेत. तसेच शास्त्रीजींच्या भाविकांची संख्या देशातच नाही तर परदेशातही झपाट्यानं वाढत आहे. धीरेंद्र शास्त्री आता देशातील वेगवेगळ्या शहरांमध्ये दरबार भरवू लागले आहेत. त्यांचा जन्म 4 जुलै 1996 रोजी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव रामकृपाल गर्ग तर आईचे नाव सरोज गर्ग आहे. सुरुवातीला धीरेंद्र श्री सत्यनारायणाची कथा सांगत असत. त्यानंतर छत्तरपूरमधील गाडा गावात बालाजी हनुमान मंदिराजवळ दिव्य दरबार भरवू लागले. या दरबारात हळूहळू भाविक आणि चाहत्यांची गर्दी वाढू लागली. धीरेंद्र यांच्या दरबारात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच ज्येष्ठ अभिनेते अरुण गोविल यांच्यासारख्या सेलिब्रेटींनीदेखील हजेरी लावली आहे. धीरेंद्र दरवर्षी गरीब तरुणींसाठी विवाहसोहळा आयोजित करतात. यंदा या सोहळ्यात मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान सहभागी झाले होते.
Ram Navami 2023 : लक्ष्मणानं 'इथं' कापलं होतं शूर्पणखाचे नाक, पाहा कुठं आणि कशी आहे 'ती' जागा, Video
सध्या सुरू असलेल्या वेगवेगळ्या चर्चांच्या अनुषंगाने काही दिवसांपूर्वी एका चॅनेलशी बोलताना धीरेंद्र यांनी सांगितलं की, ``जिथं विज्ञान संपतं, तिथून अध्यात्म सुरू होतं. आम्ही मानव सेवा करत आहोत. कोणत्या व्यक्तीकडून कोणतं काम करून घ्यायचं हे ईश्वर ठरवतो, आम्ही नाही.``
दरम्यान, सध्या धीरेंद्र शास्त्रींचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. आपण भाविकांचा पदस्पर्श का टाळतो, याचं कारण शास्त्रींनी या व्हिडिओत सांगितलं आहे. ते म्हणाले की, ``तुम्ही भाविकांना पाया का पडून देत नाही, असा प्रश्न मला अनेक लोकांनी विचारला. या मागे दोन कारणं आहेत. पहिलं म्हणजे माझ्याजवळ बालाजीचा दंड असतो. त्यामुळे भाविकांनी मला स्पर्श करणं टाळावं. हा दंड आमची साधना असते आणि तिचे काही नियम आहेत. या दंडाला दुसऱ्या व्यक्तीने स्पर्श केल्यास आमची साधना भंग होऊ शकते. त्याचा आमच्या शरीरावर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. त्यामुळे माझ्या गुरुचा मला आदेश आणि उपदेश आहे.
तसंच दुसरं कारण की, लोकांना नमस्कार कसा करावा हे नीट माहिती नसतं. लोक येतात आणि माझ्या गुडघ्याला स्पर्श करतात.गुडघ्याला स्पर्श करून आशीर्वाद मिळू शकतो का? याचा अर्थ मिसकॉल दिल्यासारखा आहे. लोकांना योग्य पद्धतीनं पाया पडता किंवा पदस्पर्श करता येत नाही. त्यामुळे आम्ही लोकांना आमच्या पाया पडा, आम्हाला प्रणाम करा, असं सांगत नाही.``
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Madhya pradesh