मुंबई, 12 मे : विदर्भातील सहकारी साखर कारखान्यांच्या (vidarbha sugar factory) अडीअडचणींवरील उपाययोजना आणि कारखान्यांना टिकविण्यासंदर्भात धोरण आखण्यासाठी शासन स्तरावर अभ्यास समिती गठित करण्याचे निर्देश सहकार मंत्री बाळासाहेब पाटील (minister balasaheb patil) यांनी दिले.
जय किसान सहकारी साखर कारखाना (sugar factory) लि., बोदेगाव, ता.दारव्हा, जि.यवतमाळ सुरु करण्याबाबत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. त्यावेळी पाटील बोलत होते. या बैठकीला माजी मंत्री माणिकराव ठाकरे, साखर आयुक्त शेखर गायकवाड, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक अजित देशमुख आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
सहकारमंत्री पाटील म्हणाले, शेतकरी हितासाठी विदर्भातील सहकारी साखर कारखाने टिकविणे गरजेचे आहे. यावर्षी राज्यात उसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होत असल्याचे दिसून येत आहे. विदर्भातील शेतकरी उसाचे उत्पादन घेत आहेत. या भागातील सहकारी कारखान्यांच्या समस्या, अडीअडचणी सोडवून त्यांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी शासन सकारात्मक पावले उचलत आहे.
सन 2009 पासून बंद असलेला बोदेगाव येथील जय किसान सहकारी साखर कारखाना महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या ताब्यात असून हा कारखाना विक्री/ भाडेतत्वावर देण्याकरिता 2017 व 2022 मध्ये निविदा मागविण्यात आली होती. परंतु निविदा प्राप्त झालेली नव्हती. सद्यस्थितीत हा कारखाना विक्री/ भाडेतत्वावर देण्यासंदर्भात महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेमार्फत निविदा सूचना प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. इच्छुक संस्था, कंपन्यांकडून निविदा प्राप्त झाल्यानंतर त्यांना सवलती देण्याबाबत शासन सहकार्य करेल असे पाटील म्हणाले.
राज्यातील साखर कारखाने अद्यापही सुरू
आहे. यंदाच्या वर्षी राज्याने साखर उत्पादनाचे सर्व विक्रम मोडीत निघण्याची शक्यता आहे. 9 मे पर्यंत राज्यात 1,288.52 लाख टन उसाचे गाळप झाले असून 134.28 लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. राज्यात दिवाळीनंतर 198 साखर कारखाने सुरू करण्यात आले होते त्यापैकी 106 कारखान्यांचा हंगाम संपला आहे. 23 लाख टन ऊस शिल्लक असताना, अंतिम साखर उत्पादनाचा आकडा 135 लाख टनांवर जाण्याची शक्यता असल्याचे मत गायकवाड यांनी सांगितले.
साखर आयुक्तांच्या अंदाजानुसार राज्यातील जवळपास सर्वच कारखान्यांचा हंगाम मे अखेर संपणार आहे. परंतु बीड, जालना आणि उस्मानाबादमधील पाच कारखाने जूनच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत सुरू राहणार आहेत. मान्सून नेहमीपेक्षा लवकर येण्याची अपेक्षा असल्याने, कारखान्यांमधील यंत्रणा मोठ्या प्रमाणात राबवून उसतोडणी आणि गाळप लवकरात लवकर पूर्ण करावं लागणार आहे. महाराष्ट्रातील साखर उद्योगाच्या इतिहासात पहिल्यांदाच राज्यात पावसाळ्याच्या अगदी सुरुवातीपर्यंत गाळप होणार आहे.