मुंबई, 17 एप्रिल : महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान सोहळा पार पडल्यानंतर या कार्यक्रमाला उष्माघातामुळे झालेल्या मृत्यूंमुळे गालबोट लागलं. यावरून आता महाराष्ट्र सरकारसह प्रशासनावर नियोजनावरून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. उन्हाचा कडाका माहिती असतानाही अशा प्रकारे कार्यक्रमाचे आय़ोजन कसे केले गेले? असे प्रश्न विरोधकांकडून विचारले जात आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही यावर प्रतिक्रिया दिली असून या सोहळ्याला लागलेलं गालबोट टाळता आलं नसतं का? असा सवाल त्यांनी विचारला.
राज ठाकरे म्हणाले की, काल ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी ह्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान झाला, ही अतिशय आनंदाची बाब आहे. हा पुरस्कार जेंव्हा घोषित झाला तेंव्हा मी आप्पासाहेबांचं आणि सरकारचं अभिनंदन केलं होतं. पण ह्या सोहळ्याला जे गालबोट लागलं ते टाळता आलं नसतं का ? कधी नव्हे ते मुंबईत सुद्धा उष्माघाताच्या बातम्या वाचायला मिळत असताना, इतक्या कडाक्याच्या उन्हात हा कार्यक्रम न करता त्याची वेळ संध्याकाळची असावी हे प्रशासनाला कळलं नाही का?
महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा; नेमकी चूक कुठे झाली? राऊतांनी स्पष्टच सांगितलं
सरकारने जरी मृतांच्या नातेवाईकांना मदतीची घोषणा केली असली तरी इतक्यावर न थांबता अशा दुर्दैवी घटना पुन्हा होणार नाहीत आणि प्रशासन अशा चुका करणार नाही ह्याची काळजी घ्यावी असा सल्लाही राज ठाकरे यांनी दिला. तसंच या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या श्री भक्तांच्या कुटुंबियांच्या दुःखात महाराष्ट्र नवनिर्माण सहभागी असल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलं.