पाणीपुरीने घेतला नर्सिंगच्या विद्यार्थीनीचा जीव?
उदय तिमांडे, प्रतिनिधी नागपूर 07 जुलै : आपल्यापैकी अनेकजण आवडीने पाणीपुरी खातात. पावसाळ्यात तर पाणीपुरी खाणाऱ्यांचं प्रमाण आणखीच वाढतं. मात्र, आता नागपुरातून जी घटना समोर आली आहे, ती वाचून कदाचित तुम्हीही पाणीपुरी खाण्याआधी दहावेळा विचार कराल. नागपुरात पाणीपुरी खाल्ल्यानंतर नर्सिंगची एक विद्यार्थीनी आजारी पडली आणि उपचारादरम्यानच तिचा मृत्यू झाला. नागपूर मेडिकल नर्सिंगच्या विद्यार्थीनीने 3 जुलै रोजी संध्याकाळी बाहेर जाऊन पाणीपुरी खाल्ली होती. त्यानंतर रात्री तिला उलटी आणि अतिसार (हगवन) याचा त्रास सुरू झाला. दुसऱ्या दिवशी तिने मेडिकलमध्ये जात औषधं घेतली. मात्र, यानंतरही प्रकृती खालावत असल्याने 5 जुलैला तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर तिची प्रकृती आणखी खालवली. Viral News - धक्कादायक! चिप्स खाल्ल्यानंतर मुलीचा मृत्यू; समोर आलं असं कारण की… गुरूवारी रात्री उपचारादरम्यानच तिचा मृत्यू झाला. या घटनेमुळे तिला पाणीपुरीतून विषबाधा झाली का? हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मृतक विद्यार्थीनी जम्मू काश्मीरची रहिवासी आहे. तिच्याशिवाय आणखी दोन विद्यार्थीनींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेत मृत्यू झालेल्या मेडिकल कॉलेजच्या बी.एस.सी नर्सिंगच्या 18 वर्षीय विद्यार्थिनीचं नाव शीतल कुमार असं आहे. चिप्स खाल्ल्याने मृत्यू - अशीच आणखी एक घटना नुकतीच समोर आली होती. ज्यात चिप्स खाल्ल्यानंतर एका मुलीने आपला जीव गमावला. तिने शाळेत लंचमध्ये चिप्स खाल्ले. त्यानंतर ती बेशुद्ध झाली. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण तिचा मृत्यू झाला. झाडरखंडमधील ही धक्कादायक घटना आहे. जमशेदपूरमधील आदिवासी प्लस 2 हायस्कूल सीतारामडेरामधील नववीच्या वर्गातील ही 14 वर्षांची विद्यार्थिनी होती. कृतिका कुमारी असं तिचं नाव असल्याचं सांगितलं जातं आहे.