बीड, 23 फेब्रुवारी : लग्न म्हटलं की मंगलाष्टकं आलीच पण बीडमध्ये (Beed) मात्र मंगलाष्टकांऐवजी वंदे मातरम या गीतावर विवाह सोहळा पार पडला. राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay munde) यांच्या उपस्थितीत हा अनोखा विवाहसोहळा पार पडला. असा विवाह सोहळा पाहून धनंजय मुंडेही भारावून गेले. बीड तालुक्यातील पाली येथील आनंदग्राममध्ये हा अनोखा विवाह सोहळा संपन्न झाला. आनंदग्राम हे एचआयव्हीग्रस्त मुलांचं संगोपन केंद्रं जिथं एचआयव्हीबाधित कुटुंबातील अनाथ असलेल्या तरुण-तरुणींचा विवाह झाला. दोन जोडप्यांचं लग्न इथं पार पडलं. या विवाहसोहळ्यात कोणतेही धार्मिक विधी झाले नाही. वधू-वरानं फक्त एकमेकांना हार घातले. विशेष म्हणजे या लग्नात मंगलाष्टकंही म्हणण्यात आली नाही. तर वंदे मातरम गीतावर हे लग्न लावण्यात आलं. असा विवाहसोहळा पाहून धनंजय मुंडेही भारावले. “आपल्या आयुष्यात आपण अनेक विवाहसोहळे आपण पाहिले. सामुदायिक विवाहसोहळे आयोजित केले. पण अशा अनोख्या विवाह सोहळ्याला उपस्थित राहता आलं हे माझं भाग्य समजतो”, अशी प्रतिक्रिया मुंडेंनी दिली आहे. हे वाचा - Pooja Chavhan Death: हा सोहळा कशासाठी? पूजाला न्याय मिळेपर्यंत लढा देतच राहणार दरम्यान जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले धनंजय मुंडे यांनी आनंदग्राम या संस्थेला मदतही केली आहे. राष्ट्रीय महामार्गापासून या केंद्राला जोडणाऱ्या रस्त्याचे सिमेंट क्राँकिटीकरण करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीतून त्यांनी 50 लाख रुपये मंजूर केले आहेत. पावसाळा सुरू व्हायच्या आधी या रस्त्याचं काम पूर्ण होईल, असं आश्वासन त्यांनी दिलं आहे. हे वाचा - महाराष्ट्रात पुन्हा का होतोय कोरोनाचा उद्रेक? केंद्र सरकारनं सांगितली कारणं डॉ. बाबा आमटे यांच्या प्रेरणेतून संस्थेचे संचालक दत्ता बारगजे आणि संध्याताई बारगजे यांनी एचआयव्हीबाधितांची सेवा करण्याचं व्रत हाती घेतलं. त्यांना सक्षम करून समाजात सन्मानानं जगण्याची संधी देण्याचं महान कार्य ते करत आहेत. आनंदग्राम ही संस्था आजपर्यंतच्या सरकारकडून दुर्लक्षित राहणं हे अनाकलनीय आणि दुर्दैवी आहे, असंही मुंडे म्हणाले.