नवी दिल्ली, 23 फेब्रुवारी : भारतातील कोरोनाची (coronavirus) कमी झालेली प्रकरणं अचानक वाढू लागली आहे आणि याचं कारण म्हणजे महाराष्ट्रासह (maharashtra coronavirus) पाच राज्यांत झालेला कोरोनाचा उद्रेक. महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण पुन्हा झपाट्यानं वाढू लागले आहेत. मुंबई, पुण्यातच नव्हे तर आता विदर्भातही कोरोनानं हातपाय पसरले आहेत. राज्यातील वाढत्या कोरोनामागे नेमकी काय कारणं आहेत, हे केंद्र सरकारनं सांगितलं.
देशात सध्या 1.50 लाखांपेक्षा कमी अॅक्टिव्ह केसेस आहेत. त्यापैकी केरळ आणि महाराष्ट्रातच सर्वाधित आहेत. इथं 50,000 पेक्षा जास्त प्रकरणं म्हणजे जवळपास एकूण प्रकरणांच्या 75% प्रकरणं या दोन राज्यांत आहेत. त्यापैकी महाराष्ट्रात 36.87% आणि केरळमध्ये 37.85% प्रकरणं आहेत. अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे.
नीती आयोगाचे सदस्य आणि भारताच्या कोव्हिड टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. व्ही. के. पॉल म्हणाले, "भारतात यूकेत आढळलेल्या कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचे 187, दक्षिण आफ्रिकेतील नव्या स्ट्रेनचे 6 आणि ब्राझीलमधील नव्या स्ट्रेनचा एक रुग्ण आहे. महाराष्ट्र, केरळ आणि कर्नाटकात रूप बदलेल्या कोरोनाची प्रकरणं दिसून आली आहेत. पण यामुळे कोरोना वाढतो आहे, असं म्हणू शकत नाही"
हे वाचा - नव्या स्ट्रेनपासून बचाव करण्यासाठी असा वापरा मास्क; तज्ज्ञांनी सांगितली युक्ती
इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चचे (ICMR) महासंचालक डॉ. बलराम भार्गवा म्हणाले, "महाराष्ट्र आणि केरळमध्ये N440K आणि E484K कोरोना आहे. पण राज्यातील उद्रेकाशी या नव्या व्हेरिएंटचा संबंध जोडू शकत नाही. कारण या व्हेरिएंटमुळे कोरोना प्रकरणं वाढत आहेत याबाबत अद्याप काही पुरावा सापडलेला नाही"
कोरोनाचा नेमका उद्रेक का झाला याची माहिती घेण्यासाठी केंद्रानं एक पथक पाठवलं आहे. या पथकानं अभ्यास केल्यानंतर उद्रेकाचं नेमकं कारण समजेल आणि मग त्यावर नियंत्रण कसं मिळवायचं याची योजना आखली जाईल.
हे वाचा - ठाकरे सरकारचा मोदी सरकारला जोरदार झटका; Coronil बाबत घेतला मोठा निर्णय
"या उद्रेकात नव्या व्हेरिएंट किती जबाबदार आहे, याबाबत अद्याप वैज्ञानिक पुरावा मिळालेला नाही. पण जेव्हा प्रकरणं कमी होतात तेव्हा बेजबाबदारपणा वाढतो. सर्वकाही सुरळीत झाल्यानंतर हलगर्जीपण केला जातो आहे. आता केंद्रीय पथकानं पाहणी केल्यानंतरच सत्य समोर येईल", असं केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सांगितलं.