संभाजीराजे छत्रपतींनी दिला इशारा
ज्ञानेश्वर साळुंखे, कोल्हापूर 25 जुलै : तुळजाभवानी मातेचे मौल्यवान अलंकार तसेच छत्रपती शिवाजी महाराजांनी तुळजाभवानी देवीला दिलेले आणि भाविकांनी वाहिलेल्या सोन्या-चांदीच्या वस्तूंची मोजणी पूर्ण होऊन तीन आठवडे लोटले. ही मोजणी पूर्ण झाल्यानंतर अत्यंत धक्कादायक बाब समोर आली. देवीचे मौल्यवान दागिने गहाळ झाल्याची बाब समोर आली. याबाबत आता कोल्हापूर छत्रपती घराण्याचे वंशज युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी चौकशीची मागणी केली आहे. आपल्या पत्रात त्यांनी म्हटलं, ‘छत्रपती घराण्याचे कुलदैवत आणि संपूर्ण महाराष्ट्राचे श्रध्दास्थान असलेल्या श्री. तुळजाभवानी देवीच्या दागिन्यांची मोजदाद केली असता, काही ऐतिहासिक महत्व असलेले मौल्यवान दागिने गहाळ झाल्याचे समजत आहे. याची चौकशी व्हावी अशी मागणी कोल्हापूर छत्रपती घराण्याचे वंशज संभाजीराजे छत्रपती यांनी पत्राद्वारे केली आहे.
संभाजीराजे छत्रपती यांचं पत्र
यापुढे सर्व दागिन्यांची मोजणी ॲान कॅमेरा करावी, तसेच याचा संपूर्ण अहवाल सार्वत्रिक करावा. गहाळ दागिन्यांची संपुर्ण चौकशी करावी आणि संबंधित दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा स्वराज्याच्या वतीने मोठे आंदोलन उभे करण्याचा इशारा या पत्राद्वारे देण्यात आला आहे. तुळजाभवानी देवीचे अलंकार गहाळ - दररोज वापरात असलेल्या 1 ते 7 क्रमाकांच्या डब्यापैकी क्रमांक 6 डब्यातले 8 ते 10 अलंकार गायब असल्याचे उघड झाले आहे . हे दागिने कधी गायब झाले याबाबतचा काही अंदाजही बांधता आलेला नाही.