फडणवीस विखेंच्या मनातले मुख्यमंत्री
हरीश दिमोटे, प्रतिनिधी शिर्डी, 22 एप्रिल : मागच्या वर्षी जून महिन्यामध्ये महाराष्ट्रात राजकीय भूकंप झाला. एकनाथ शिंदे शिवसेनेच्या 40 आणि 10 अपक्ष आमदारांसह महाविकासआघाडी सरकारमधून बाहेर पडले, यामुळे उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपद सोडावं लागलं आणि महाविकासआघाडी सरकार कोसळलं. ठाकरेंनी राजीनामा दिल्यानंतर फडणवीस मुख्यमंत्री होतील, असं बोललं जात होतं. पण एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेत अनेकांना धक्का दिला. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. फडणवीसांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यामुळे भाजप नेत्यांची वक्तव्य चर्चेत आली. आता यात भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांची भर पडली आहे. देवेंद्र फडणवीस आमच्या मनातले मुख्यमंत्री आहेत, असं विखे पाटील म्हणाले आहेत.
आताच्या युती सरकारमध्ये एकनाथ शिंदे समजदार नेते आहे, मात्र आमच्या मनातले मुख्यमंत्री देवेंद्रजी आहेत, असं वक्तव्य राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं. शिर्डी मतदारसंघातील राहता इथल्या प्रकट मुलाखतीमध्ये विखे पाटील बोलत होते. याआधी तत्कालिन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही एकनाथ शिंदेंबाबत विधान केलं होतं. एकनाथ शिंदे यांना मनावर दगड ठेवून मुख्यमंत्री केलं, असं पाटील म्हणाले, त्यानंतर मोठा वाद निर्माण झाला. भाजपचे सध्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही आता देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करायचं आहे, असं वक्तव्य केलं होतं. दादांमुळे पवार कनफ्यूज शरद पवार राज्याला नेहमी कनफ्यूज ठेवतात, मात्र आता अजितदादांनी त्यांना सुद्ध कनफ्यूज केलं आहे, त्यामुळे अजित पवारांच्या मनात काय आहे, हे कुणाला समजणार? असं मिश्किल भाष्य विखे पाटील यांनी केलं.