राज्यातील मान्सूवर बिपरजॉयचा परिणाम
मुंबई 16 जून : अरबी समुद्रातून उठलेलं बिपरजॉय चक्रीवादळ गुरुवारी संध्याकाळी गुजरातच्या किनारपट्टीवर धडकलं आणि यासोबतच गुजरातमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली. वेगाने वारे वाहू लागले. त्यामुळे अनेक ठिकाणी विजेचे खांब उन्मळून पडले. मोठी झाडे उन्मळून पडली. हवामान खात्याने सौराष्ट्र, द्वारका आणि कच्छच्या सागरी किनारपट्टीसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. गुजरातमधील 7 जिल्हे आणि 450 हून अधिक गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. आयएमडीच्या म्हणण्यानुसार, वादळ जमिनीवर आले आहे. चक्रीवादळाचा धोका लक्षात घेता किनारी भागातून 94 हजारांहून अधिक लोकांना दुसरीकडे हलवण्यात आलेलं आहे. या चक्रीवादळाचा राज्यातील मान्सूनवर परिणाम झाला आहे. 11 जून रोजी राज्यात मान्सूनने हजेरी लावली. यानंतर राज्यात पुढच्या 4 ते 5 दिवसांत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली होती. मात्र, आता बिपरजॉय चक्रिवादळामुळे मान्सूनची गती मंदावली आहे. Biparjoy Cyclone : भारतात धडकणाऱ्या वादळाला ‘बिपरजॉय’ का म्हणतात? वादळांना अशी नावं कोण देतं? राज्यात रविवारी तळ कोकणात मान्सून दाखल झाला होता. मात्र बिपरजॉय वादळामुळे मान्सूनच्या पुढील वाटचालीमध्ये अडथळा निर्माण झाला. त्यानुसार आता हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार, येत्या 23 जूनपासून मध्य भारत आणि महाराष्ट्रात मान्सून बरसण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे. बिपरजॉय चक्रिवादळामुळे मान्सूनची गती मंदावली आहे. परिणामी जसा चक्रीवादळाचा प्रभाव कमी होईल तसा मान्सून राज्यभरात सक्रीय होईल, असं हवामान खात्यानं म्हटलं. दुसरीकडे स्कायमेटने म्हटलं आहे की, देशात पुढील चार आठवड्यापर्यंत म्हणजेच 6 जुलैपर्यंत कमी पाऊस पडेल. जून हा पेरणीपूर्ण कामं आणि पेरणीचा महिना आहे. अशातच आता जूनमध्ये कमी पावसाचा अंदाज असलेल्या शेतकऱ्यांच्या चिंतेत मात्र वाढ झाली आहे.