मुंबई, 14 फेब्रुवारी : आसामच्या मुख्यमंत्र्यांनी ‘भीमाशंकर ज्योतिर्लिंग आसामात असल्याचा दावा केल्यामुळे वाद निर्माण झाला आहे. बारा ज्योतिर्लिंगांपैकी सहावे ज्योतिर्लिंग म्हणुन महाराष्ट्रातील खेड तालुक्यातील भिमाशंकर कडे पाहिले जातं. मात्र आता काहीच दिवसांवर महाशिवरात्री महोत्सव तोंडावर आल्यानंतर आसामचे मुख्यमंत्री हिमंत विश्व शर्मा यांनी भिमाशंकर आसाम मध्ये असल्याचं भासवलं आहे. याबाबतच्या जाहिराती आसाम सरकारकडून करण्यात येत आहेत. ज्योतिर्लिंगाच्या या मुद्द्यावरून राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. ‘भाजपाच्या नेत्यांनी महाराष्ट्राच्या वाट्याला काहीही ठेवायचं नाही असं ठरवलंय काय? अगोदर महाराष्ट्राच्या वाट्याचे उद्योग आणि रोजगार पळविले आणि आता चक्क आमचा सांस्कृतिक व अध्यात्मिक वारसा पळविण्याचा घाट घातलाय….!’, असं ट्वीट सुप्रिया सुळे यांनी केलं आहे. या ट्वीटमध्ये सुप्रिया सुळे यांनी या जाहिरातीचा फोटोही शेअर केला आहे.
‘घटनाबाह्य ED सरकार-आपण गुवाहाटीला आमदारांची फौज पळवून नेली होती.तिथं तुमची सर्व सोय अदृश्य शक्तीच्या वतीने आसामच्या मुख्यमंत्र्यांनी केली होती.त्याचवेळी तुम्ही बदल्यात हे भीमाशंकर ज्योतिर्लिंग तर देऊन आला नाहीत ना?अर्थात अशी शक्यता नाकारता येत नाही’, असा टोलाही सुप्रिया सुळे यांनी लगावला आहे. ‘श्रीमद् आद्य शंकराचार्य आपल्या बृहद रत्नाकर स्तोत्रामध्ये स्पष्टपणे म्हणतात की, भीमा नदीचा उगम आणि डाकिनीचे जंगल हेच भीमाशंकर ज्योतिर्लिंग. त्यामुळे महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर हेच १२ ज्योतिर्लिंग मंदिरांपैकी एक आहे, अन्य कोणतेही नाही.आता आणखी कुणाची साक्ष हवी ?’, असा प्रश्नही सुप्रिया सुळे यांनी विचारला आहे.
‘महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना नम्र विनंती आहे की, कृपया महाराष्ट्राचा सांस्कृतिक व अध्यात्मिक वारसा जपण्यासाठी याची तातडीने दखल घ्यावी.या विषयाबाबत आसामच्या मुख्यमंत्र्यांना वस्तुस्थिती कळवून आपली हरकत नोंदवावी’, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे.