(रवी राणा आणि नवनीत राणा)
संजय शेंडे, प्रतिनिधी अमरावती, 29 एप्रिल : राज्यात बाजार समितीच्या निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. अनेक ठिकाणांहून निकाल समोर आले आहे. अमरावतीमध्ये खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना धक्का बसला आहे. काँग्रेसच्या नेत्या आणि माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी एकहाती सत्ता राखली आहे. रवी राणा यांचा भाऊ सुद्धा इथं पराभूत झाला आहे. रवी राणांच्या गटाला एकही जागा मिळाली नाही. अमरावती कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक मतमोजणी पूर्ण झाली आहे. बाजार समितीच्या या निवडणुकीमध्ये रवी राणा हे संपूर्ण ताकदीनिशी उतरले होते. मात्र रवी राणा यांना त्यांचे मोठे बंधू सुनील राणा यांना देखील निवडून आणता आले नाही. पराभवाचा मोठा धक्का आमदार रवी राणाआणि त्यांच्या सोबत असलेल्या भाजपाला बसलेला आहे. (बीड जिल्ह्यात आघाडीचा युतीला दे धक्का! भावाचा बहिणीला तर काकाचा पुतण्याला छोबीपछाड) 2019 च्या निवडणुकीत खासदार नवनीत राणा यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादीने समर्थन दिले. मात्र त्यानंतर नवनीत राणा थेट केंद्रात भारतीय जनता पक्षाला पाठिंबा दिला तर आमदार रवी राणा यांना देखील बडनेरा मतदार संघातून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने समर्थन दिले होते. त्यांनी देखील निवडून आल्यानंतर थेट भाजपला पाठिंबा दिला. उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’वर हनुमान चालीसा पठणाचा आग्रह केल्याने राणा दाम्पत्याला 14 दिवस तुरुंगाची हवा खावी लागली होती, तर उद्धव ठाकरे यांचे महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यात राणा यांची देखील महत्त्वाची आहे भूमिका होती. (धनुभाऊ जोमात, पंकजाताईंना मोठा धक्का; परळीत राष्ट्रवादी पुन्हा!) बाजार समितीच्या निवडणुका म्हणजे हे पुढे येणाऱ्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीचा ग्रामीण भागात जनतेचा काय कल याची चाचपणी समजली जाते. या निवडणुकीत राणा यांच्या पॅनलचा पूर्णतः सुफडा साफ झाल्याने राणा यांनी जी भारतीय जनता पक्षाला पाठिंबा देण्याची भूमिका घेतली ती कुठेतरी सामान्य मतदाराला आवडली नाही, असा देखील तर्क वितर्क काढला जात आहे. हनुमान चालीसा गैरवापर करणाऱ्याला धडा शिकवला - यशोमती ठाकूर दरम्यान, नागपूरनंतर विदर्भातील सर्वात मोठी अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत यशोमती ठाकूर यांच्या पॅनलच्या सर्वच्या सर्व 18 जागा विजयी झाल्या. यावेळी आमदार रवी राणा आणि भाजपच्या पॅनलचा यशोमती ठाकूर गटाने दारुण पराभव केला यावेळी विजयानंतर यशोमती ठाकूर यांनी स्वतः रस्त्यावर येत मोठा जल्लोष केला. गुलालाची उधळण करत विजय उत्सव साजरा केला. ‘हनुमान चालीसाचा गैरवापर करणाऱ्या राणा दाम्पत्याला शेतकऱ्यांनी धडा शिकवला राणा दाम्पत्याने चांदीचे नाणे वाटले तर धनशक्ती विरुद्ध जनशक्तीचा हा विजय आहे, अशी प्रतिक्रिया यशोमती ठाकूर यांनी दिली.