प्रियांका बोबडे, प्रतिनिधी अहमदनगर, 23 मार्च: निझामशहाच्या काळात अनेक मराठा सरदार अहमदनगर दरबारी कार्यरत होते. अहमदनगर राजधानीचं शहर असल्याने मराठा सरदारांचं तिथे वास्तव्य होते. छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजीराजे भोसले हे निझामशाहीतील मातब्बर सरदार होते. शिवभक्त असलेल्या मालोजीराजेंनी अहमदनगरमध्ये शिवमंदिर बांधले. हेच अमृतेश्वर मंदिर आजही तत्कालिन इतिहासाची साक्ष देत आहे. अमृतेश्वर शिवमंदिराची उभारणी मालोजीराजे भोसले हे निझामशाही दरबारात सरदार होते. राजधानी अहमदनगरमध्ये त्यांनी सरकारवाडा बांधला. तसेच शिवभक्त असल्याने वाड्यालगत अमृतेश्वर शिवमंदिर बांधले. पुढे शहाजीराजेही निजामशहाच्या दरबारात होते. काही काळ तेही या सरकार वाड्यात वास्तव्यास होते. तेव्हा या परिसराला शहाजी मोहल्ला म्हणून ओळखले जात होते.
शिवाजी महाराजांशी कनेक्शन अमृतेश्वर मंदिराची निर्मिती शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजीराजेंनी केली. वडील शहाजीराजेही अहमदनगर वास्तव्यात या मंदिरात जात होते. तसेच शिवरायांचे आजोबा लखुजी जाधव हेही निझामशहाच्या दरबारात होते. त्यामुळे शिवरायही अहमदनगरला गेल्यानंतर या मंदिरात जात असत, असे सांगितले जाते. अमृतेश्वर मंदिर इतिहासाचे साक्षीदार कालौघात आता सरकारवाडा राहिला नाही. मात्र, सोळ्याव्या शतकात बांधलेले अमृतेश्वर शिवमंदिर शिवभक्तांचे श्रद्धास्थान असून इतिहासाचे साक्षीदार आहे. नवी पेठेत असणारे हे मंदिर अद्याप आहे त्या स्थितीत आहे. मंदिराचा आतील गाभारा अद्याप कायम असून पेशवे काळात मंदिराचा जीर्णोद्धार झाल्याचे सांगितले जाते. या शिवालयात वर्षातून दोन मोठे उत्सव साजरे केले जातात. महाशिवरात्री व श्रावण महिन्यातील सोमवारी येथे धार्मिक कार्यक्रम असतात. Gudi Padwa 2023 : शोभायात्रेत कोल्हापूरकरांनी अनुभवली महाराष्ट्राची लोककला, पाहा Video अहमदनगरमध्ये आहेत इतिहासाच्या पाऊलखुणा अहमदनगरच्या निजामशाहीत भोसले, जाधव, निंबाळकर असे अनेक मोठे सरदार कार्यरत होते. त्यामुळे त्यांचे वास्तव्य आणि राहते वाडे देखील त्याकाळी या परिसरात होते. आता सरकारवाडा, घोड्याची पागा, कारंजी, पाणीपुरवठा करणारी खापरी नळ काळाच्या पडद्याआड गेले. परंतु त्यांनी बांधलेले हे शिवालय, काही तळघरं आणि भुयारं तेवढी उरली आहेत. येथे आपल्याला इतिहासाच्या पाऊलखुणा दिसतात.