राधाकृष्ण विखे पाटील
अहमदनगर, 11 एप्रिल : येत्या काही दिवसांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पायउतार होणार असून त्यांच्याजागी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना मुख्यमंत्रीपदाची संधी दिली जाणार आहे, अशा बातम्या सोशल मीडियात व्हायरल होत आहेत. यावर विखे पाटील यांनी स्वत: प्रतिक्रिया दिली आहे. “माझ्या संदर्भात पसरविले जात असणाऱ्या बातम्या कपोलकल्पीत असून मला बदनाम करण्याचे षडयंत्र आहे”, असा आरोप विखे पाटील यांनी केला आहे.
काय आहे प्रकरण? समाज माध्यमांमधून राधाकृष्ण विखे पाटील राज्याचे मुख्यमंत्री होणार अशी बातमी पसरत आहे. सुप्रिम कोर्टात एकनाथ शिंदे आणि इतर आमदारांवर अपात्रतेच्या कारवाईवर शिक्कामोर्तब होणार असून त्यापूर्वीच एकनाथ शिंदे राजीनामा देतील आणि विखे पाटील राज्याचे मुख्यमंत्री होतील अशा वावड्या उठवल्या जात आहेत. मात्र, विखे पाटलांनी हे माझ्या बदनामानीचे षडयंत्र असल्याचं म्हटलं आहे. माझ्या बदनामीचे षडयंत्र : विखे पाटील माझ्या संदर्भात पसरविले जात असणारे वृत्त हे कपोलकल्पीत आणि मला बदनाम करण्याचे षडयंत्र आहे. अशा वावड्या पसरविण्याचे काम काही मंडळी करीत आहेत. माझी बदनामी करण्याच्या हेतू आहे. यामध्ये कोणतेही तथ्य नाही, राज्याला एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून सक्षम नेतृत्व मिळाले आहे. राज्याचा निर्णय हा पंतप्रधानांच्या स्तरावर झाला असल्याने यामध्ये कुठलीही विसंगती असण्याचे कारण नाही, असे स्पष्ट मत विखे पाटील यांनी व्यक्त केले. वाचा - Chandrakant Patil : बाबरी ढाचा पाडताना शिवसैनिक होते पण…; चंद्रकांत पाटलांनी दिलं स्पष्टीकरण शरद पवारांची भूमिका योग्य : विखे पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि विखे पाटील कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी आहेत. मात्र, पवार यांनी अलीकडेच अदानी समूहाबद्दल मांडलेल्या नव्या भूमिकेचे विखे पाटील यांनी कौतुक केले आहे. विखे पाटील म्हणाले, अदानी उद्योग समूहाच्या संदर्भात ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी घेतलेली भूमिका योग्यच आहे. जेपीसीच्या मागणीवरून राजकारण करणारे विरोधक देशातील गुंवणूकदारांचे झालेले अर्थिक नूकसान भरून देणार आहेत काॽ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाच्या विकासाचा आलेख उंचावत आहे.