पेनकिलर औषधांचं सेवन ठरू शकतं धोकादायक
मुंबई, 13 जुलै : किरकोळ अंगदुखी, डोकेदुखी किंवा दुखापत झाल्यास पेनकिलर अर्थात वेदनाशामक औषध सहज घेतलं जातं. बऱ्याचदा अशी औषधं स्वतःच्या मनाने घेतली जातात. त्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेतला जाण्याचं प्रमाण खूपच कमी आहे. वास्तविक कोणतंही औषध मनाने आणि सातत्याने घेणं आरोग्यासाठी अपायकारक ठरू शकतं. बऱ्याच जणांना शारीरिक वेदना शमवण्यासाठी पेनकिलर औषधं घेण्याची सवय लागलेली असते; पण ही सवय घातक ठरू शकते. सातत्याने पेनकिलर औषधं घेतल्यास लिव्हरवर गंभीर परिणाम होऊ शकतो, असं तज्ज्ञ सांगतात. पेनकिलर औषधांचे शरीरावर कसे दुष्परिणाम होतात ते जाणून घेऊ या. `इंडियन एक्सप्रेस`ने याविषयी माहिती देणारं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. डोकेदुखी, पाठदुखी किंवा पायदुखी अशा समस्यांसाठी पेनकिलर औषधं घेणं चुकीचं नाही; पण ही औषधं सातत्याने घ्यावी लागत असतील किंवा त्यांची सवय लागली असेल तर ही बाब आरोग्यासाठी घातक ठरू शकते. `वेदनाशामक औषधांचे दोन प्रकार असतात. त्यापैकी एका प्रकारात पॅरासिटामॉलवर आधारित औषधांचा समावेश होतो, तर दुसऱ्या प्रकारात डायक्लोफेनॅक, सोडियम, आयबूप्रोफेन, प्रोफेन, अॅसिक्लोफेनॅक यांसारख्या NSAIDs किंवा नॉन स्टेरॉइड अँटी इन्फ्लेमेटरी औषधांचा समावेश होतो. ही पेनकिलर औषधं सहज उपलब्ध असतात; पण त्यांचं सेवन करताना सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे,` असं द्वारका इथल्या मणिपाल हॉस्पिटलच्या इंटर्नल मेडिसीन विभागाचे कन्सल्टंट डॉ. संजय गुप्ता यांनी सांगितलं. Migraine : मायग्रेन ही केवळ डोकेदुखी नाही तर मेंदूची एक गंभीर समस्या, जाणून घ्या हे समज-गैरसमज ते म्हणाले, की `सलग 3 ते 4 महिने रोज एक ग्रॅमपेक्षा जास्त पॅरासिटामॉलचं सेवन केल्यास लिव्हर आणि किडनीचं नुकसान होऊ शकते. एक ग्रॅम पॅरासिटामॉल NSAIDs इतकं नुकसानदायी नसलं तरी ते जास्त प्रमाणात सेवन करू नये.`
`NSAIDs विषयी बोलायचं झालं, तर या औषधांमुळे लिव्हरला दुखापत होणे, अॅक्युट गॅस्ट्रायटिस, गॅस्ट्रिक अल्सर, किडनीचं कायमस्वरूपी नुकसान होणं यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. यामुळे अन्ननलिकेचं टोक फाटूही शकतं. दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ NSAIDs चे सेवन केल्याने किडनी कायमची खराब होऊ शकते,` असं डॉ. गुप्ता यांनी सांगितलं. `पेनकिलर औषधांचं जास्त प्रमाणात सेवन केल्याने अॅक्युट गॅस्ट्रायटिस आणि गॅस्ट्रिक अल्सर होऊ शकतो. यामुळे पोटात वेदना, अस्वस्थता, खोकला जाणवेल. हे आजार आणखी बळावल्यास खोकल्यातून रक्त पडू शकतं,` असं डॉ. गुप्ता म्हणाले. `रक्ताच्या उलट्या होत असतील तर अल्सर सच्छिद्र असू शकतो. अशा वेळी तातडीने वैद्यकीय उपचार घेण्याची गरज आहे,` असं त्यांनी स्पष्ट केलं. `पेनकिलर औषधं जास्त प्रमाणात घेतल्याने किडनी खराब झाली तर तिचं कार्य बिघडेल आणि सामान्य प्रमाणाच्या तुलनेत कमी लघवी होईल. इतर धोक्याच्या लक्षणांमध्ये शरीरावर सूज येणं, चालताना धाप लागणं यांचा समावेश होतो,` असं डॉ. गुप्तांनी सांगितलं. `पेनकिलरच्या जास्त सेवनामुळे लिव्हरवर विपरीत परिणाम होऊ शकतो. लिव्हर टॉक्सिसिटी होऊ शकते. अशा वेळी उजव्या बरगडीच्या खाली लिव्हरजवळ तीव्र वेदना, जडपणा जाणवतो. तसंच लिव्हर फंक्शन टेस्टमध्ये लिव्हर एंझाइम आणि बिलिरुबिनची पातळी वाढलेली दिसते,` असं डॉ. गुप्ता यांनी सांगितलं. `लिव्हर फंक्शन बिघडल्याने रक्ताच्या कार्यावर परिणाम होतो. यामुळे रक्त पातळ होतं. रक्त गोठण्यासाठी आवश्यक घटक लिव्हर निर्माण करत असतं. या घटकांची कमतरता निर्माण झाल्यास रुग्णाला अचानक रक्तस्राव होऊ शकतो,` असं डॉ. गुप्ता म्हणाले. त्यामुळे अति प्रमाणात पेनकिलरचं सेवन अन्य गंभीर आजारांना निमंत्रण देऊ शकतं. कोणत्याही वेदनेसाठी पेनकिलर औषधं घेण्यापूर्वी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.