तुमची लहान मुलं लठ्ठ होत चाललीयेत? त्यांना द्या 'असा' आहार, जाणवेल परिणाम
शाळा नुकत्याच सुरू झाल्या आहेत. शाळेच्या सुरुवातीच्या दिवसातच मुलांच्या दिनक्रमाचं वेळापत्रक व्यवस्थित बसलं, तर पुढे वर्षभर मुलांना ते पाळणं जड जात नाही. या दिनक्रमात सर्वांत महत्त्वाचा भाग आहार आणि व्यायामाचा असतो. सध्याच्या मुलांना फास्टफूडची इतकी सवय झाली आहे, की त्यामुळे अनेक लहान मुलांमध्ये लठ्ठपणा वाढतो आहे. त्यावर उपाय म्हणून शाळेच्या सुरुवातीच्या दिवसांमध्येच मुलांना घरच्या पौष्टिक डब्याची व व्यायाम आणि खेळाची सवय लावली पाहिजे. त्यामुळे मुलं सुदृढ व चपळ बनतील. मुंबईच्या एशियन हार्ट इन्स्टिट्यूटमधले इंटरव्हेंशनल कार्डिऑलॉजिस्ट डॉ. अभिजित बोरसे यांनी त्याबाबत मार्गदर्शन केलं आहे. गेल्या काही वर्षांमध्ये मुलांचा आहार कमालीचा बदलला आहे. सहज उपलब्ध होणारं फास्टफूड खिशालाही परवडणारं असतं. पालकांची क्रयशक्तीही वाढली असल्यानं मुलांना या गोष्टी सहज मिळतात; मात्र यामुळे मुलांमध्ये लठ्ठपणाची समस्या बळावते आहे. फास्टफूडमध्ये शरीराला अपायकारक अनेक घटक असतात. चरबी, अतिरिक्त साखर आणि सोडियम असतं. त्याच वेळी त्यात पोषणमूल्य मात्र अभावानंच आढळतात. हे अन्न सतत खाल्ल्यामुळे वजन वाढतं, चरबी वाढते आणि भविष्यकाळात हृदयाशी संबंधित आजार होण्याचा धोकाही वाढतो. म्हणून मुलांना घरी तयार केलेले पौष्टिक पदार्थच डब्यात देऊन त्यांची सवय लावली पाहिजे.
संतुलित आहार कसा असावा? हृदयाचं आरोग्य सांभाळण्यामध्ये संतुलित आहाराचा महत्त्वाचा वाटा असतो. संतुलित आहार म्हणजे नेमकं काय? विविध जीवनसत्त्वं, खनिजं शरीराला देणारे विविध खाद्यपदार्थ योग्य प्रमाणात घेणं म्हणजे संतुलित आहार घेणं. मुलांच्या डब्यामध्येही अशा प्रकारचा संतुलित आहार असेल, याची पालकांनी काळजी घेतली पाहिजे. फळं आणि भाज्या – कोणत्याही आहारातला हा सर्वांत प्रमुख घटक आहे. ऋतुमानानुसार पिकणारी रंगीबेरंगी फळं व भाज्या खाण्यासाठी मुलांना प्रोत्साहन द्यावं. त्यात शरीरासाठी आवश्यक पोषणमूल्य व फायबर्स असतात. धान्य – रिफाइंड पदार्थांपेक्षा अख्ख्या धान्यापासून तयार केलेला ब्रेड, पास्ता यांची निवड करावी. यातून शरीराला फायबर मिळतं. त्याची पचनशक्ती सुधारण्यासाठी मदत होते. रक्तातली साखरेची पातळी नियंत्रणात राहते व हृदयरोगाचा धोका कमी होतो. कमी चरबी असलेले प्रथिनयुक्त पदार्थ – डाळी, टोफू या कमी चरबी असलेल्या प्रथिनांमुळे अमिनो अॅसिड्स शरीराला मिळतात. यातून कमी सॅच्युरेटेड फॅट शरीरात जातं. Weight Loss : पाणी प्यायल्याने वजन कमी होत? जाणून घ्या पाणी पिण्याची वेळ आणि पद्धत चांगली चरबी – अॅव्होकॅडो, नट्स, बिया, ऑलिव्ह ऑइल यातून शरीरासाठी आवश्यक व चांगली चरबी मिळू शकते. यामुळे शरीरातली सूज, दाह कमी होऊन कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रणात राहते. कमी साखर – मुलांना डब्यात खूप गोड पदार्थ, पॅकबंद अन्नपदार्थ, प्रक्रिया केलेले पदार्थ देऊ नयेत. कारण यातून अतिरिक्त साखर मुलांच्या शरीरात जाते. त्याऐवजी फळं, घरी केलेली चिक्की, दही, वड्या या गोष्टी द्याव्यात. आहाराबरोबरच मुलांना सतत क्रियाशील राहण्यासाठी प्रेरित करणं गरजेचं आहे. नियमित व्यायाम, मैदानावरचे खेळ यामुळे त्यांच्या हृदयाचं आरोग्य नीट राहू शकतं. मुलांचा स्क्रीन टाइम कमी केला, तर हे शक्य होऊ शकतं व मुलांचं वजन नियंत्रणात राहील. शालेय वयापासूनच मुलांना योग्य आहार व नियमित व्यायामाची सवय लावली, तर ती मुलांना त्यांच्या भविष्यात निश्चित उपयोगी पडू शकते.