file photo
नवी दिल्ली, 15 एप्रिल : साधारणपणे 45 ते 45 वयोगटातील महिलांमध्ये रजोनिवृत्ती म्हणजे मासिक पाळी कायमची बंद होणे सुरू होते. मात्र, याबाबत आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशन (एनसीबीआय) च्या अहवालानुसार, धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामध्ये बदलती दिनचर्या, रोजचा आहार, मद्यपान, बिघडलेली हार्मोनची स्थिती, उशिरा लग्न करणे यामुळे सध्या 30 ते 35 वर्षे वयातच स्त्रियांमध्ये मासिक पाळी बंद होत आहे. 2016 मध्ये रजोनिवृत्तीचे प्रमाण 1.5% होते. 2021-2022मध्ये वाढ होत हे प्रमाण 2.1% झाले आहे. यामुळे 35 पेक्षा अधिक वय असतानाही आई होण्याचे स्वप्न पूर्ण होण्यास महिलांना अनंत अडचणींचा सामना करावा लागत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दै. लोकमतने याबाबतचे वृत्त दिले आहे. नेमकं असं का होतंय - महिला डॉक्टरांचे म्हणणे आहे की, कोरोनानंतर दर महिन्याला 3 ते 4 केसेस येत आहेत. महाराष्ट्र, दिल्ली, राजस्थानमध्ये रजोनिवृत्तीच्या समस्या येत आहेत. मुंबईमध्येही अशी प्रकरणे सातत्याने वाढत आहेत. महिलांच्या जीवनशैलीत झपाट्याने होत असलेल्या बदलाचा परिणाम मासिक पाळीवर होत आहे. मेट्रो शहरातील बहुतांश तरुण-तरुणी उशिरा लग्न करतात. याचा परिणाम महिलांच्या प्रजनन क्षमतेवर होतो आणि वंध्यत्वाचे प्रमाण वाढू लागते, असे स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. शालिनी राठोड सांगतात. तुम्हालाही सारखी चक्कर येते का? या गंभीर अजाराचे असू शकते लक्षण! लक्षणे काय? लघवी संसर्ग, अचानक घाम येणे, चिडचिड, नैराश्य, राग-मूड बदलणे, कमी झोप, वजन वाढणे, त्वचा कोरडी पडणे, केस गळणे, अनियमित मासिक पाळी येणे, सेक्स करण्याची इच्छा कमी होणे, लघवीवरील नियंत्रण कमी होणे ही रजोनिवृत्ती येण्याची लक्षणे आहेत. कोणता हार्मोन धोकादायक? बहुतेक महिलांमध्ये अँटी म्युलेरियन हार्मोन (एएमएच) पातळी 1 एनजी/ एमएलपेक्षा कमी असते. यामुळे गर्भधारणेतील समस्या व्यतिरिक्त वयाच्या आधी मासिक पाळी बंद होते. धूम्रपान आणि अल्कोहोलमुळे-देखील हार्मोनल असंतुलन होत या समस्या उद्भवतात, असे स्त्रीरोग तज्ज्ञांचे म्हणणे आहे. काय कराल? रजोनिवृत्ती दरम्यान जास्तीत जास्त वेळ सैल कपडे घाला. वजनावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. योगासने, व्यायाम, सकस आहार, भरपूर पाणी प्या, तळलेल्या आणि गरम अन्नापासून दूर राहा, असा सल्ला स्त्रीरोगतज्ज्ञ देतात.