नवी दिल्ली, 03 फेब्रुवारी : मोदी सरकारच्या कृषी सुधारणा विधेयकांविरोधात (agriculture reform laws) गेल्या काही दिवसांपासून दिल्लीच्या वेशीवर शेतकऱ्यांचं आंदोलन (Farmers protest) सुरू आहे. 26 जानेवारीला या आंदोलनानं हिंसक स्वरूप घेतलं. भारतातील या शेतकरी आंदोलनाला विदेशी सेलिब्रिटींनी पाठींबा दिला आणि यामुळे भारतात फूट पडू नये, यासाठी भारतीय सेलिब्रिटी (Indian celebrity) सरसावले आहेत कृषी कायदे मागे घेण्याची मागणी आंदोलक शेतकरी करत आहेत. त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर पाठिंबा मिळतो आहे. अगदी अमेरिकन पॉप गायिका रिहानापासून पॉर्न स्टार म्हणून ओळख असलेल्या मिया खलिफापर्यंत अनेक आंतरराष्ट्रीय सेलेब्रिटींनी या आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या पोस्ट सोशल मीडियावर केल्या. यानंतर आता भारतीय सेलिब्रिटीदेखील सोशल मीडियावर व्यक्त झाले आहेत. कोणत्याही चुकीच्या प्रचाराला भारतीयांनी बळी पडू नये. भारतीयांनी एकजूट राहण्याची गरज आहे, असं ट्वीट अनेक सेलिब्रिटींनी केलं आहे. आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटींनी शेतकरी आंदोलनाला पाठींबा जाहीर केल्यानंतर त्यांची कानउघाडणी करणारं एक निवेदन भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने (Ministry of external affairs) प्रसिद्ध केलं. त्यावर भारतीय सेलिब्रिटींनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अक्षय कुमार, अजय देवगण, करण जोहर, सुनील शेट्टी असे बरेच सेलिब्रिटी व्यक्त झाले आहेत.
“शेतकरी हा आपल्या देशाचा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे मतभेद निर्माण केले जात आहेत त्याकडे लक्ष देण्याऐवजी जो ठराव झाला आहे, त्याचं समर्थन करूया”, असं ट्वीट अक्षय कुमारनं केलं आहे.
तर “भारतविरोधी किंवा भारताच्या पॉलिसीविरोधात कोणत्याही चुकीच्या प्रचाराला बळी पडू नका. या घडीला कोणत्याही आपासातील वादाशिवाय एकवटण्याची गरज आहे”, असं अजय देवगण म्हणाला.
आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटींनी केलेले काही ट्वीट्स चर्चेत आहेत. त्यानंतर त्यांना उत्तर देण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाने (MoE) एक निवेदन प्रसिद्ध केलं. सोशल मीडियावर सनसनाटी निर्माण करतील असे हॅशटॅग वापरून कमेंट्स करणं लोकप्रियतेचा सोपा मार्ग आहे. खास करून प्रसिद्ध सेलेब्रिटींनाही हा मोह आवरला नाही तर ते अगदी बेजबाबदारपणाचं आहे, असं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं.