कोल्हापूर, 04 ऑगस्ट : केंद्राकडून उसाच्या एफआरपी दरात वाढ करण्यात आली ही वाढ टनापाठीमागे 150 रुपयांची असल्याचे बोलले जात आहे. शेतकऱ्यांना यंदा 10.25 रिकव्हरीला 3050 रुपये प्रतिटन दर मिळणार आहे. या निर्णयाचे केंद्र सरकारकडून स्वागत करण्यात आले आहे. परंतु शेतकरी संघटनांनी याला विरोध केला आहे. शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी याला तिव्र विरोध केला आहे. (Raju Shetti on FRP)
राजू शेट्टी म्हणाले कि, केंद्र सरकारने उसाची एफआरपी जाहीर करून शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. गतवर्षासाठी 10 टक्के उताऱ्यास 2900 रुपये दर होता. तो आता 10.25 टक्क्यांसाठी 3050 रुपये प्रतिटन करण्यात आला आहे. त्यामुळे वरकरणी 150 रुपयांची वाढ दिसत असली, तरी प्रत्यक्षात शेतकऱ्यांना प्रतिटनास 75 रुपयेच हाती मिळणार आहेत. ही वाढ अत्यंत जुजबी व कमी असून, केंद्र सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केल्याची टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केली आहे.
हे ही वाचा : ईडी तावडीतून कसे सुटणार? भुजबळांनी अनुभवातून राऊतांना दिल्या शुभेच्छा, म्हणाले…
मूळ उतारावाढ करण्याची गरज नसताना केवळ उतारा चोरणाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्राने हा खटाटोप केल्याचा आरोप त्यांनी केला. याचबरोबर वाढलेले खतांचे दर, डिझेल दरात होणारी वाढ या सगळ्यांचा विचार केल्यास शेतकऱ्यांना 250 रुपये वाढ देणे अपेक्षित होते परंतु केंद्राने जुजबी दरवाढ करत शेतकऱ्यांना पुन्हा फसवल्याची टीका शेट्टी यांनी केली.
राज्य सहकारी साखर कारखाना संघाचे व्यवस्थापकीय संचालक संजय खताळ म्हणाले, ‘उताऱ्यात ०.२५ टक्के वाढीमुळे १५० रुपयांची वाढ दिसत आहे. मात्र, पूर्वीच्या दहा टक्क्यांप्रमाणे तपासणी करता प्रतिटनास ७३ रुपये ७५ पैसे इतकी प्रत्यक्ष वाढ मिळेल. शेतकऱ्यांसाठी झालेल्या वाढीचे साखर संघ स्वागत करीत आहे. मात्र, कारखान्यांनी १ नोव्हेंबर ते ३१ मार्च दरम्यान अधिक ऊस गाळप करायला हवा.’
हे ही वाचा : शिंदेंपाठोपाठ देवेंद्र फडणवीसांचेही सर्व कार्यक्रम रद्द, दिल्लीला झाले रवाना
साखर आयुक्त शेखर गायकवाड म्हणाले, ‘एफआरपीचा मूळ उतारा १० वरुन १०.२५ टक्के केल्यामुळे शेतकऱ्यांना मिळणारी पहिली उचल रक्कम आता पूर्वीच्या तुलनेत जास्त मिळेल’
ऑक्टोबर महिन्यापासून सुरु होणाऱ्या ऊस- साखर वर्षासाठी हा एफआरपी दर दिला जाईल. गेल्या आठ वर्षात एफआरपी दरात 34 टक्क्यांनी वाढ करण्यात आली असल्याचेही सरकारकडून सांगण्यात आले आहे. एफआरपी दरात यंदा क्विंटलमागे 15 रुपयांची वाढ झालेली आहे. मूळ रिकव्हरी दर 10.25 टक्के गृहीत धरून क्विंटलमागे 305 रुपये इतका एफआरपी दर दिला जाणार असून प्रत्येक वाढीव 0.1 टक्के रिकव्हरीमागे 3.05 रुपये इतका प्रीमियम अर्थात दरवाढ दिली जाईल. हेच सूत्र मूळ रिकव्हरी दरापेक्षा कमी रिकव्हरी भरणाऱ्या उसासाठी वापरले जाईल.