मुंबई, 07 जून : महाराष्ट्रात मान्सून (Maharashtra monsoon update) कधी दाखल होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. मात्र राज्यात मान्सून पुढे ढकलला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या मान्सून कर्नाटक समुद्र किनारपट्टीचा बहुतांश भाग व्यापून गोव्याच्या सीमेवर आल्याने कोकणात मॉन्सून लवकर दाखल होण्याची स्थिती होती. (Konkan monsoon) परंतु मॉन्सूनचा प्रवास संथगतीने सुरु असल्याने अरबी समुद्रापर्यंतच पावसाचा वेग आहे. यामुळे महाराष्ट्रातील पावसाचे आगमन लांबले आहे. संपूर्ण ईशान्य भारतासह सिक्कीम आणि पश्चिम बंगाल राज्यांच्या विविध भागात मॉन्सून दाखल झाला आहे. दरम्यान विदर्भात उष्णतेची लाट (Vidarbha heat wave) कायम असल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
उष्ण लाटेने विदर्भ अक्षरशः भाजून निघत असल्याने उन्हाचा चटका असह्य होत आहेत. दरम्यान राज्यातही काही जिल्ह्यांमध्ये कमाल तापमानात वाढ झाली आहे. आज (ता. 7) विदर्भात उष्ण लाटेचा इशारा असून, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या दक्षिणेकडील जिल्ह्यात विजा, मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
हे ही वाचा : ‘आम्हाला आता टेन्शन नाही’ आमदारांना हॉटेलवर सोडल्यानंतर एकनाथ शिंदेंची सूचक प्रतिक्रिया
मागच्या 24 तासांमध्ये विदर्भातील गोंदिया जिल्ह्यात राज्यातील उच्चांकी 45.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर वर्धा, नागपूर येथे 45 अंशांपेक्षा अधिक, ब्रह्मपुरी, अकोला येथे 44 अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली. राज्यातही उन्हाचा चटका आणि उकाडा चांगलाच वाढला आहे. पूर्व उत्तर प्रदेश आणि परिसरावर असलेल्या चक्राकार वाऱ्यांपासून दक्षिण छत्तीसगडपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. पूर्व मध्य बंगालच्या उपसागरात चक्राकार वाऱ्यांच्या स्थिती असून, त्यापासून श्रीलंकेपर्यंत हवेचा कम दाबाचा पट्टा सक्रिय आहे.
आज (7 जून) राज्यात उन्हाचा चटका राहणार असून, विदर्भात उष्ण लाट कायम राहण्याचा इशारा हवामान विभागाने दिलाआहे. पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान झाल्याने मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या दक्षिणेकडील जिल्ह्यात विजा, मेघगर्जनेसह पावसाचा अंदाजही हवामान विभागाने वर्तविला आहे.
राज्यातील मागच्या 24 तासातील तापमान
राज्यात मागच्या 24 तासांत पुणे 36.5, धुळे 40.3, जळगाव 41.4, कोल्हापूर 34.2, महाबळेश्वर 28.9, नाशिक 36.3, निफाड 37.4, सांगली 35.7, सातारा 37.9, सोलापूर 39.6, रत्नागिरी 34.6, औरंगाबाद 40.6, परभणी 42.7, नांदेड 40.6, अकोला 44.5, अमरावती 43.9, बुलडाणा 40.6, ब्रह्मपुरी 44.6, चंद्रपूर 43.2, गोंदिया 45.6, नागपूर 45.3, वाशीम 41.5, वर्धा 45.5, यवतमाळ 42.5 तापमानाची नोंद झाली.
राज्यात यंदा पुरेसा पाऊस
मान्सून केरळमध्ये (Monsoon arrives in Kerala) दाखल झाल्याची घोषणा भारतीय हवामान विभागा (IMD)कडून दोन दिवसांपूर्वी जाहीर करण्यात आली. मान्सूनचे आगमन होणार असल्याने शेतकऱ्यांसह सगळ्यांनाच दिलासा मिळाला आहे. दरम्यान यंदा देशात पुरेसा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. यंदा देशात 96 ते 106 टक्के पाऊस पडणार असल्याचे सांगण्यात आले आहे. यामुळे यंदा देशात सगळीच धरणे भरण्याची शक्यता आहे.