मुंबई, 14 फेब्रुवारी : राज्यात फेब्रुवारीच्या मध्यापासूनच उन्हाच्या झळा सहन करण्याची वेळ आली आहे. दिवसा उन्हाच्या झळा तर रात्री थंडी अशी अवस्था राज्यातील काही जिल्ह्यांची झाली आहे. दरम्यान पुणे, मुंबई आणि कोकणातील काही जिल्ह्यात उन्हाच्या झळा असह्य होत आहेत. मागच्या दोन दिवसांपासून कोकण आणि पुणे परिसरात पारा 35 अंशांवर जाऊन पोहोचल्याचा अंदाज आहे. याचबरोबर मागच्या 24 तासांत सोलापूर जिल्ह्यात 37 तर कोल्हापूर जिल्ह्यात 35 अंशांची नोंद झाली. तर पुणे आणि मुंबई या दोन मुख्य शहरांचाही पारा 35 पर्यंत गेला आहे. दरम्यान याचा परिणाम नागरिकांच्या थेट आरोग्यावर होत असल्याचे दिसून येत आहे.
मुंबईकरांना दोन दिवसांपासून उन्हाचे चटके सहन करावे लागत आहेत. मुंबईत मागच्या 24 तासांत कमाल तापमान 36 अंशांवर गेले होते. महाराष्ट्रात उष्णतेची लाट पसरली आहे. त्यामुळे दुपारच्या वेळी उन्हात फिरताना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे. मुंबईतील तापमान गेल्या एक दोन दिवसांपासून वाढ होत असून मुंबईतील कमाल तापमान देखील 36 अंशांवर गेले आहे.
हे ही वाचा : जालन्याच्या शेतकऱ्याची कमाल! पपई लागवडीतून केली लाखोंची कमाई, पाहा Video
सांताक्रूझ वेधशाळेत किमान तापमान 24.2 अंश सेल्सिअसची नोंद तर कुलाब्यात 23.5 अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे. रविवारी (12 फेब्रुवारी) मुंबईतील सांताक्रूझ वेधशाळेत किमान तापमान 16.6 अंश सेल्सिअस इतक्या कमी तापमानाची नोंद झाली आहे.
राज्यातील तापमानात सातत्याने चढ उतार होत आहेत. कधी थंडीचा कडाका तर कधी ढगाळ वातावरण जाणवत आहे. या तापमानातील चढ उताराचा शेती पिकांवर देखील परिणाम होत असल्याचं चित्र दिसत आहे. दरम्यान, 12,13 आणि 14 फेब्रुवारी दरम्यान राज्यातील किमान तापमानात घट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. यामुळे उत्तर विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात थंडीचा प्रभाव अधिक जाणवण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
राज्याच्या उत्तरेत किमान तापमानात घट कायम आहे. धुळ्यासह निफाड येथील गहू संशोधन केंद्रात 8.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. धुळे, पुणे, नाशिक आणि औरंगाबाद येथे किमान तापमान 10 अंशांच्या जवळपास आहे. विदर्भासह मराठवाड्याच्या तापमानातही घट झाली आहे. कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात मात्र किमान तापमानात मोठी घट झाली आहे.
निरभ्र आकाश, स्वच्छ सूर्यप्रकाशामुळे उन्हाचा चटका वाढला आहे. दरम्यान अनेक ठिकाणी तापमान पस्तिशी पार असल्याने उन्हाच्या झळा कायम आहेत. सांगली, सांताक्रुझ, रत्नागिरी येथे तापमान 36 अंशांपार आहे. विदर्भाच्या कमाल तापमानात घट झाली आहे.
हे ही वाचा : Ahmednagar News : मोत्यासारखी ज्वारी खरेदी करायचीय? ‘इथं’ संपेल शोध, Video
दरम्यान मागच्या 24 तासांत पुणे 34.1 (10.6), जळगाव 33 (10.1), धुळे 32 (8), कोल्हापूर 35 (19), महाबळेश्वर 31.6 (13.4), नाशिक 31.2 (10.9), सांगली 36.1 (17.3), सातारा 35.2 (16.4), सोलापूर 37.2 (16.5), रत्नागिरी 36.4 (21.2), औरंगाबाद 32.2 (10.2), नांदेड (16.2), परभणी 34.4 (13.4), अकोला 35 .2 (12.5), 4.8), ब्रम्हपूरी 33.7 (14.6), चंद्रपूर 31 (11), नागपूर 31.8 (11.7) तापमानाची नोंद झाली.